कोल्हापूर – कोल्हापुरात व्हॉट्सऍप स्टेटसवरून उसळलेल्या दंगलीनंतर कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे. काल शहरात झालेल्या राड्याप्रकरणी शहरातील तीन पोलिस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 400 आरोपी असून त्यातील 36 जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये तिघेजण अल्पवयीन आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दिली.
पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले की, स्टेटस ठेवणारे हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते कोणाशी संबंधित आहेत का? त्यांना कोणी चिथावणी दिली होती का? यासंबंधीचा तपास सुरू आहे.
औरंगजेबाचे फोटो व्हॉट्सऍपला ठेवणाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल जप्त केल्यानंतर मोबाईल तपासणी करताना त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलिट केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, त्यांनी स्टेटसला ठेवलेले व्हिडिओ आणि फोटो त्यांना कुठून मिळाले होते, याचीही तपासणी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती दुपारपासून पूर्ववत झाली आहे. 4 एसपीआरएफच्या तुकड्या, 300 पोलीस कॉन्स्टेबल, 60 पोलीस अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.