अकोले -लग्नातील वराती आणि निवडणुका हे तरुण मुलांना आयुष्यात प्रथम दारू पाजण्याची प्रशिक्षण केंद्रे झाल्याने आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त होतील, यासाठी गावातील जाणत्या व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अकोले तालुका दारूबंदी आंदोलन समितीने केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, निवडणुका आठवड्यात संपून जातील.पण व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील. हे व्यसनी तरुण तुमच्या माझ्या घरातीलच असणार आहेत.
आज फुकट दारू पिणाऱ्यांना उद्या स्वखर्चाने दारू प्यावी लागणार आहे. याचे भान ठेवून दोन्हीही स्पर्धक पॅनेलने व गावातील जाणत्या व्यक्तींनी गांभीर्य ठेवून दारू वाटणाऱ्या, मुलांना हॉटेलमध्ये नेणाऱ्या उमेदवारांना समज द्यावी व गावातील मतदारांनी असे उमेदवार पराभूत करावेत.
अशा उमेदवारांच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कराव्यात. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनीही दारू वाहतूक, वेळ संपल्यावर रात्री हॉटेल उघडी ठेवणारे व अवैध दारूची विक्री याबाबत लक्ष ठेवावे व कारवाई करावी.
याबाबत समितीच्या वतीने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. दारूमुक्त निवडणूक व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आंदोलनाचे कार्यकर्ते अशोक सब्बन, हेरंब कुलकर्णी, रंजना गवांदे, भाऊसाहेब येवले, संतोष मुतडक, अमोल घोलप, कारभारी गरड, बाळासाहेब मालुंजकर, संदीप दराडे, मारुती शेळके, जालिंदर बोडके यांनी केले आहे.