कोल्हापूर – कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावले असून सोमय्या यांनी दिशाभूल करत आरोप केल्यामुळे त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपकडून वारंवार आरोप लावले जात आहेत. सोमय्यांना कारखान्याचे नाव देखील वाचता येत नाही. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून माझी हवी तिथं खुशाल चौकशी करावी, असे आव्हान देखील मुश्रीफ यांनी दिले.
“राजकारणात, समाजकारणात आपली प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष घालवावी लागतात, कष्ट करावे लागतात. पण कुणीही यावं आणि डाग लावावा ही परिस्थिती आली आहे. माझ्यावर आधी असे आरोप झाले, तेव्हा मी मानहानीचे दावे ठोकले आहेत. आता हा सातवा दावा ठोकणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
मी 17 वर्षे या राज्यात मंत्री आहे. माझ्यावर एक साधा आरोप झाला नाही, चौकशी झाली नाही, कुणी चर्चा केली नाही. भाजपाच्या सत्ताकाळात चिक्की घोटाळा, मुंबईचा गृहनिर्माण घोटाळा असे घोटाळे झाले. माझ्यावर तर कधीच आरोप झाले नाहीत”, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सोमय्यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर घोटाळ्याचे आरोप केले. यावेळी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.