नवी दिल्ली – पेगॅसस हे इस्त्रायली सॉफ्टवेअर वापरून देशातील खासगी व्यक्तींचीही सरकारने हेरगिरी केली असल्याच्या आरोपाची चौकशी केली जावी अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सध्या सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते पण आज प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास केंद्राने असमर्थता व्यक्त करीत हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत विषय असल्याचे प्रतिपादन केले.
पण केंद्र सरकारच्या वकिलांची कानउघडणी करताना सुप्रीम कोर्टाने नमूद केले की राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत विषयावर केंद्राची काळजी रास्त असली तरी आमचा मुद्दा या सॉफ्टवेअरचा वापर करून व्यक्तिगत स्वरूपात काही जणांवर पाळत ठेवली गेली होती की नाही एवढाच आहे. तेवढ्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण झालेच पाहिजे असेही सुप्रीम कोर्टाने आज सुनावले आहे.
आज झालेल्या सुनावणीच्यावेळी ऍडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेला युक्तिवाद मासलेवाईक ठरला. केंद्राने त्यांना या प्रकरणात आज प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते, पण सरकारने आज असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासच नकार दिला. त्यावर बोलताना तुषार मेहता म्हणाले की, हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत विषय असल्याने आम्ही हे प्रतिज्ञापत्र सादर करू शकणार नाही.
आम्ही कोणते सॉफ्टवेअर वापरतो ही बाब दहशतवाद्यांना समजता कामा नये अशी आमची या मागची भूमिका आहे असे ते म्हणाले. त्यावर मेहता यांना खडे बोल सुनावताना कोर्टाने म्हटले आहे की व्यक्तिगत हेरगिरीसाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला गेला होता काय याची माहिती आम्ही तुम्हाला विचारली होती. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत याविषयीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करा अन्यथा आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल असे कोर्टाने केंद्राला सुनावले.
जर एखाद्या व्यक्तीने तक्रार केली की या सॉफ्टवेअरमुळे माझ्या प्रायव्हसीच्या अधिकाराचा भंग झाला आहे, तर हा गंभीर मामला आहे आणि आम्हाला त्यात मध्ये पडावेच लागणार आहे असेही कोर्टाने स्पष्ट केले. त्यावर कमिटी नेमण्याचा तोडगा तुषार मेहता यांनी सुचवला. पण कोर्टाने तोही मान्य केला नाही.
यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले की पेगॅससचा वापर करून देशातील काही महत्वाच्या व्यक्तिंची हेरगिरी केली गेली की नाही एवढाच आमच्यासाठीही महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यात पडायचेच नाही. ती जपली जाणे आमच्यासाठीही महत्वाचेच आहे. पेगॅससचा वापर करून राहुल गांधी, प्रशांत किशोर, अनिल अंबानी यांच्या सारख्या व्यक्तींच्या फोनवरही हेरगिरी केल्याचा आरोप आहे.