मुंबई – महिलांवर अन्याय,अत्याचार होऊ नये ही राज्य सरकारची भूमिका आहे. साकीनाका सारख्या घटनेत सरकार कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही, त्याला वाचवण्याची भूमिका कधीच घेणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
पुढे मंत्री मलिक म्हणाले की, साकीनाक्याच्या घटनेमधील जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. लवकरात लवकरच चार्जशीट दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला शिक्षा करावी, ही राज्य सरकारची भूमिका आहे.
महिला सुरक्षेचा विषय चुकीच्या पद्धतीने पुढे आणला जात आहे. भाजपच्या लोकांना अशा प्रकारे चुकीचा प्रसार करण्याची सवयच लागली आहे. त्यांनी भाजपशासित राज्यांकडे बघावे. त्या राज्यांमध्ये आरोपींना तेथील सरकार पाठीशी घालण्याचे काम करतेय हे सत्य आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी भाजपावर केला.