दुबई – आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे विजेतेपद मिळवू शकेल असा संघ म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्यांनी सुरुवात ज्या पद्धतीने केली व नंतर ज्या पद्धतीने त्यांची कामगिरी खालावत आहे ते पाहता आजच्या सामन्यात त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे. हैदराबादलाही या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या सामन्यातील विजय आवश्यक आहे.
लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, निकोलस पुरन व काही प्रमाणात करुण नायर यांनी फलंदाजीची बाजू समर्थपणे सांभाळली आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्यांना अपयश आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांना या सामन्यात पूर्ण तयारीने उतरावे लागणार आहे.
मनदीप सिंग, पुरन यांना चेन्नईविरुद्ध खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. कर्णधार राहुलने दर्जाला साजेशी कामगिरी केली. मात्र, सुरुवातीला मयंक आग्रवालने जी कामगिरी दाखवली त्यात सातत्य राखण्यात तो गेल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरत आहे. सुरुवातीच्या सामन्यात त्याने राहुलच्या साथीने संघाला भक्कम सलामी दिली होती. चेन्नईविरुद्ध मात्र, त्याने निराशा केली व त्याचाच पंजाबला फटका बसला.
गोलंदाजीतही महंमद शमी वगळता एकाही गोलंदाजाला समोरच्या संघावर दडपण ठेवता आलेले नाही. शेल्डन कोट्रेल, रवी बिष्णोई, ख्रिस जॉर्डन यांच्याकडून अपेक्षीत केलेली कामगिरी होताना दिसत नाही. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दीपक हुडा व मुरुगन अश्विन यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. बिष्णोईकडून सुमार कामगिरी होत असली तरी अश्विनसह फिरकी गोलंदाजी जास्त सशक्त बनवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खेळपट्टीवर आतापर्यंत या स्पर्धेत झालेल्या सामन्यात फिरकी गोलंदाज यशस्वी ठरले असल्याने राहुलचा भर देखील फिरकी गोलंदाजांवरच राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे हैदराबादचा संघ पूर्णपणे कर्णधार डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो याच दोघांवर अवलंबून आहे. त्यांच्या एकाही फलंदाजाला सरस कामगिरी करता आलेली नाही हीच त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. वॉर्नरने एकहाती सामने जिंकून दिले आहेत. तसेच त्याच्याच नेतृत्वाखाली हैदराबादने एकदा ही स्पर्धा देखील जिंकली आहे. मात्र, सध्याच्या त्यांच्या संघात फलंदाजांचीच वानवा असल्याचे चित्र आहे.
मनीष पांडे व प्रियम गर्ग यांच्याकडून संघाला खूप आशा आहे. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे मात्र, ती योग्य वेळी दिसलेली नाही. त्यांना या सामन्यात वॉर्नरला साथ देण्याची गरज आहे. अभिषेक शर्मा व अब्दुल समद यांनाही मिळालेल्या संधीचा लाभ घेता आलेला नाही. या फलंदाजांनी जर मोठी धावसंख्या उभारली तरच त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचे रक्षण करता येणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत अखेरच्या पाच षटकांमध्येच सामन्याचे चित्र बदलले आहे. त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये भेदक गोलंदाजी करण्यासाठी हैदराबादच्या गोलंदाजांना अपार मेहनत घ्यावी लागणार आहे. संदीप शर्मा व टी. नटराजन यांचा अपवाद वगळता अन्य एकाही गोलंदाजाला आपला प्रभाव पाडता आलेला नाही. रशिद खान याने पिरकीची बाजू समर्थपणे सांभाळली असली तरीही अन्य खेळाडूंच्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.
विल्यमसनचे अपयश खटकते…
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला हैदराबादने आपल्याकडे घेतले असले तरीही यंदाच्या स्पर्धेत त्याला आपला ठसा उमटवता आलेला नाही. गेल्या सामन्यात खरेतर त्याला प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतरही सामना फिरवण्याची संधी होती. मात्र, त्याला अपयश आले व संघाला सामना गमवावा लागला. आता या सामन्यात तरी तो दर्जाला साजेशी कामगिरी करणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.