मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मराठा आरक्षण समाजाच्या मोर्चाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. मात्र यावेळी त्यांनी दोन्ही राजेंवर बोचरी टीका देखील केली. उदयनराजे यांच्यावर घणाघात करताना आंबेडकर यांनी त्यांचा नामोल्लेख टाळत एक राजा बिनडोक असल्याचं म्हंटलं होतं. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलंच कसं असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही आंबेडकरांच्या टीकेवर तीव्र आक्षेप नोंदवत साताऱ्याच्या गादीचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे.
याबाबत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे यांच्याबाबत केलेली टीका निंदनीय आहे. त्याची जेवढी निंदा करावी तेवढं कमी आहे. छत्रपती घराणं, त्यांच्या गादीला महाराष्ट्रातील जनता वंदन करत असते. दोन्हीही छत्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी छत्रपतींच्या वंशजांवर अशाप्रकारे टीका करणे हे गैर आहे, चुकीचं आहे, आम्ही सातारकर, छत्रपतींचे मावळे म्हणून ही टीका अजिबात सहन करणार नाही.’ असा इशारा त्यांनी दिला.
निलेश राणेंचेही प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र
तत्पूर्वी, प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर भाजप नेते निलेश राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. ‘राजेंना राज्यसभेवर घेतलं मात्र त्यांना कोणता पक्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील घेणार नाही.’ अशी जहरी टीका त्यांनी केली. राणे यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये, त्यांची राजघराण्यावर बोलायची लायकी नाही असंही म्हंटल होत.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, असे कुठे वाचनात आले नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण आरक्षणापेक्षा ते इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे मला दिसत आहे.”
“राज्य घटना ज्या माणसाला माहिती नाही. आरक्षण आम्हाला मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा, अशी भूमिका ते मांडतात. भाजपने त्यांना राज्यसभेवर कसे पाठवले?” असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.