बारामती पोलिसांकडून पाच जण
चार तासांत पालकांच्या स्वाधीन
दिगंबर पडकर
जळोची – अभ्यासासाठी मामा खडसावतो म्हणून घरातून बेपत्ता झालेल्या पाच अल्पवयीन मुलांना बारामती व वालचंदनगर पोलिसांनी चार तासांतच पालकांच्या स्वाधीन केले. बारामती तालुक्यातील गुणवडी येथे ही घटना घडली होती. एकाच घरातील पाच अल्पवयीन मुले अचानक गायब झाल्याने गुणवडी परिसरासह बारामती तालुक्यात खळबळ उडाली होती.
गुणवडी (ता. बारामती) येथून 1) राधिका प्रकाश साठे (वय 13), 2) प्रज्योत प्रकाश साठे (वय 11), 3) प्रतिक्षा कल्याण कुचेकर (वय 14), 4) साक्षी कल्याण कुचेकर (वय 13), 5) मानसी कल्याण कुचेकर (वय 11) असे चार मुली व एक मुलगा कस्तान चाळ येथून बेपत्ता झाले होते. अनुक्रमे नंबर एक व दोन हे बहिण भाऊ असून तीन ते पाच या तिघी बहिणी आहेत. ते पाचही जण मावसभाऊ आहेत. तिघी बहिणी माळेगाव वरून मावशीकडे आले होते. याबाबत नातेवाईकांनी बारामती शहर पोलीस ठाण्याला सायंकाळी चार वाजता माहिती दिली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थ व पोलीस पाटलांच्या मदतीने चोहोबाजूने तपास सुरू केला. दरम्यान मेखळी याठिकाणी एका दुकानदाराने ती पाचही भावंडे पाहिल्याचे सांगितले. ते वालचंदनगरचा रस्ता विचारत असल्याचे सांगितले. त्यानंतर बारामती पोलिसांनी शोधमोहीम वालचंदनगरच्या दिशेने सुरू केली. त्यानंतर सायंकाळी सातच्या दरम्यान वालचंदनगर, जंक्शन याठिकाणी दोन मुली प्रथम पोलिसांना मिळून आल्या. दरम्यान एका ओमनी गाडीत घालून त्यांना मामांकडे भेटायला घेऊन जात आहे असे सांगून वालचंदनगरच्या दिशेने घेऊन आले व त्यांना त्याठिकाणी सोडल्याचे सांगितले. ही माहिती ऐकताच पोलीसही हैराण झाले.
पोलिसांनी त्याठिकाणी वालचंदनगरचे पोलीस मित्र व स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम आणखी तीव्र केली. काही वेळानंतर त्याच भागामध्ये आणखी दोन मुली मिळून आल्या. त्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. त्यावेळी पाचही मुलांना विश्वासात घेत पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना कोणीही ओमनी गाडीतून अपहरण केलेले नाही, मुलांनी कबुली दिली. तर त्यांचा मामा ही सर्व मुले अभ्यास करत नाहीत म्हणून रागवतो तसेच सकाळीच त्याने प्रज्योत याला सुद्धा खडसावले म्हणून त्या सर्वांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पोलीस आणि नातेवाईक रागावतील म्हणून त्यांनी या प्रकारचा बनाव केल्याचे सांगितले. तसेच प्रज्योत याने घरीच चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली आहे की त्यांचा शोध घेऊ नये ते मोठे बनूनच घरी येतील. त्यानंतर पोलिसांनी प्रज्योत याचा शोध सुरू केला असता प्रज्योत हा पोलीस व नातेवाईकांना बघून पळून जावू लागला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता त्यालाही ताब्यात घेण्यात आले.
घरातले दवाखान्यात गेल्यावर केला पोबारा
तपासात निष्पन्न झाले की त्यांचा मामा त्यांच्यावर अभ्यास करत नाही म्हणून रागावला होता. त्या सर्व बालकांच्या दोघी आई ह्या सख्ख्या बहिणी असून त्या दोघी सकाळी दवाखान्यात बारामतीला आले होते. त्यामुळे वरील सर्व मुलांनी घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. सोबत कपडे व पिशवी घेतली होती. नंतर रस्त्याला येऊन ट्रक चालकाला विनंती करून वालचंदनगर जंक्शन या ठिकाणी ते उतरले होते.
समुपदेशनासह दिला मोलाचा सल्ला
जर पोलिसांनी तत्परतेने तपास केला नसता तर घटनेचे गांभीर्य खूप मोठे होऊ शकले असते. पोलिसांनी तत्परतेने तपास केला व सर्व मुले पालकांच्या ताब्यात दिली. त्यावेळी पालकांचे सुद्धा पोलिसांतर्फे समुपदेशन करून लहान मुलांना रागावून खडसावून कोणतीही गोष्ट करू नका, त्यांना विचारात घेऊन समजूतदारपणे त्यांच्याशी वागा असा मोलाचा सल्ला देऊन सर्व मुले ही त्यांच्या आई व मामाच्या ताब्यात देण्यात आली.