खडकवासला, मुळशी परिसरात खाद्यपदार्थांतून पर्यटकांची लयलूट कारवाईची मागणी
राहुल गणगे
पुणे – राज्य सरकार पर्यटन विकासासाठी वारेमाप खर्च करीत असले तरी पर्यटकांची दैना संपलेली नाही. पर्यटन हंगामात इंदापूर तालुक्यातील उजनी, भोर तालुक्यातील वीर, भाटघर, मुळशी तालुका, हवेली तालुक्यातील सिंहगड, खडकवासला तसेच जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील पर्यटनस्थळी देश-विदेशातील हजारो पर्यटकांची शहरात वर्दळ असते, मात्र त्याठिकाणी स्थानिक विक्रेत्यांकडून पर्यटकांची खाद्यपदार्थांतून मोठ्या प्रमाणात लयलूट होत आहे. त्यामुळे पर्यटनस्थळी विक्रेत्यांची गंगाजळी सुरू असल्याने पर्यटकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होऊ लागली.
पुणे जिल्ह्यातील जागतिक वारसा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. खराब रस्ते, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव, प्राथमिक सुविधांची कमतरता आणि मार्गदर्शक केंद्र नसल्यामुळे पर्यटक हवालदिल होत आहेत. तर दुसरीकडे महापालिका, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभाग जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वेस्थानक, बसस्थानकावर उतरल्यापासून पर्यटक समस्यांना तोंड देतात. खडकवासला, मुळशी परिसरात ऐरवी 5 ते 10 रुपयांना मिळणारे मक्याचे कणीस सध्या मात्र 40 रुपयांना विक्री केले जात आहे. तसेच 12 रुपयांना मिळणारी मॅगी 60 ते 70 रुपयांना पर्यटकांना विकत घ्यावी लागत आहे.
पर्यटनस्थळ पाहण्यासाठी आलेल्या राज्यातील तसेच जपानी, कोरियन, चिनी भाषिक पर्यटकांची सर्वाधिक अडचण होते. पर्यटन स्थळाकडे जाणारे खराब रस्ते, कचऱ्याचे ढीग, रिक्षाचालकांची अरेरावी, विक्रेत्यांकडून होणाऱ्या फसवणुकीने पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. करोना ओसरल्यानंतर तसेच पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पर्यटन स्थळावर गर्दी प्रचंड वाढली आहे.
पावसाळ्यात नागरिक धबधबे तसेच विविध धरणांच्या परिसरात आनंद लुटण्यासाठी जात असतात. त्याठिकाणी विविध खाद्यपदार्थाची चढ्या दरात विक्री होत आहे. मात्र, अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गाच्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्याची मागणीही वेळोवेळी व्यक्त होत आहे. परंतु याकडे अन्न व औषध प्रशासन काय भूमिका घेणार याकडे पर्यटकांचे लक्ष लागले आहे.
अन्नप्रक्रिया करून विक्री करण्यात येणाऱ्या पदार्थांच्या किमतीवर अन्न आणि औषध प्रशासनाचे नियंत्रण नसते. परंतु पदार्थाच्या दर्जावर आम्ही तडजोड करीत नाही. ग्राहकांनी दूषित अन्न पदार्थ किंवा दर्जाबाबत काही संशय असल्यास आमच्या विभागाशी संपर्क साधल्यास त्याची त्वरित दखल घेण्यात येईल.
– संजय नारागुडे, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन