जामखेड -जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेतील अनियमिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांना भोवली आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेवून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रुपनर यांच्या बदलीचे आदेश दिले असून तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आज रुपनर यांची तडकाफडकी बदली केली आहे.
दरम्यान, रुपनर याच्या कार्यकाळात निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी दिले असून दोषी आढळून येणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे. रुपनर यांच्या बदलीचे आदेश तातडीने काढून कार्यकारी अभियंतापदी उपभ्भियंता पी. एस. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपनर हे नेवासा येथे उपअभियंता यापदावर कार्यरत होते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद रिक्त असल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार रुपनर यांच्याकडे देण्यात आला होता.
जामखेड तालुक्यात मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत होणाऱ्या निविदा प्रक्रियेमध्ये मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आमदार प्रा. शिंदे यांनी रुपनर यांच्यावर केला होता तसेच रुपनर यांच्याबाबत बऱ्याच तक्रारी जिल्हा परिषदेत प्राप्त झाल्याने त्यांची बदली करण्यात आली. मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची तत्काळ भेट घेऊन सर्व प्रकार मांडला. त्यावेळी जामखेड तालुका पदाधिकारी व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले उपस्थित होते.
रुपनकर यांच्या सर्व तक्रारी मंत्री पाटील यांच्या लक्षात आल्यावर या अधिकाऱ्याची बदली करून जामखेड व कर्जत येथील मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये येणाऱ्या निविदा प्रक्रियेतील मनमानी कारभार बंद केला. तसेच या निविदा प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे योजनेतील झालेल्या चुकीची निविदा प्रक्रिया चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.