पुणे – 2028-ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे असल्यास स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. देशात सुमारे 700 जिल्हे असून काही जिल्ह्यात एक तर काहींमध्ये 2 अशा प्रकारे देशभरात 1 हजार खेलो इंडिया निपुणता केंद्रे उभारण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते.
रिजिजू म्हणाले, भारतीय खेळाडूंमध्ये क्षमता असूनदेखील त्याचे संधीमध्ये रूपांतर करण्यात आपण कमी पडतो. हेच लक्षात घेत अगदी स्थानिक पातळीवर खेळाडूंच्या क्षमता ओळखत त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने “खेलो इंडिया’ निपुणता केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. ही केंद्रे स्थानिक, राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करतील. याद्वारे खेळाडूंच्या सर्वांगिण विकासावर भर देण्यात येईल. इतकेच नाही तर खेळाडूंबरोबर नागरिकांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून देशात खेळाची संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
केवळ महाराष्ट्र नाही तर देशाच्या क्रीडा विश्वात पुण्याचे एक वेगळे स्थान आहे. राज्यभरात स्थापन होत असलेल्या राज्यातील तीन केंद्रापैकी 1 केंद्र हे पुण्यात आहे. त्यामुळे पुणे आणि महाराष्ट्र राज्य या दोघांकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. आज आपल्या देशाची क्रीडा संस्कृती वाढविण्याबरोबरच ती जपण्याची जबाबदारी आपल्याला उचलावी लागेल. अनेकदा आजी-माजी खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी सरकार या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहील, याची ग्वाही रिजिजू यांनी यावेळी दिली.
दरम्यान, याप्रसंगी तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वरूप उन्हाळकर व वरुण कपूर यांचा सत्कारही करण्यात आला.