राजगुरूनगर (प्रतिनिधी): खेड तालुक्यात वहागांव येथे निसर्ग चक्री वादळात बळींच्या संख्या २ झाली असून एकाच कुटुंबातील दोन्ही व्यक्तींचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात घरांचे, शाळांचे आणि अंगणवाड्याचे मोठ्या नुकसान झाले आहे. तालुक्यात सुमारे २५०० घरांचे नुकसान झाले असून १८ शाळा व २० पेक्षा जास्त अंगणवाड्याचा समावेश आहे. दरम्यान मयत व्यक्तींना प्रत्येकी चार लाख रुपये तातडीची मदत शासनाकडून देण्यात येणार असून माजी खासदार यांनी २५ हजरणाची मदत दिली आहे.
खेड तालुक्यात काल दि. ३ रोजी आलेल्या निसर्ग चक्री वादळाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पश्चिम भागातील गावांचा मोठा सहभाग आहे. तालुक्यातील वहागाव येथील तानाजी अनंता नवले यांच्या घराची भिंत कोसळल्याने तीन जण गंभीर जखमी झाले होते त्यापैकी मंजाबाई अनंता नवले वय ६५ व त्यांचा मुलगा नारायण अनंता नवले वय ३८ यांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे तर तानाजी अनंता नवले हे गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यात निसर्ग चक्री वादळामुळे घरांचे, शाळांचे, अंगणवाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दशक्रियाविधी घाट, मंदिरांचेही नुकसान झाले आहे. शिवे आणि वहागाव या दोन गावात सर्वाधिक नुकसान झाले आहे
वहागाव परिसरात आज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर,माजी सभापती अरुण चांभारे, एड सुखदेव पानसरे, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेंकर, भगवान पोखरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, रोहिदास गडदे, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य मिळावे अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी मोबाईलवर बोलुन केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ही मदत तातडीने मिळविण्यासाठी आग्रह धरला आहे. याशिवाय वहागाव,ता खेड येथे भिंत कोसळून मयत झालेल्या मायलेक अशा दोन व्यक्तींना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली आहे. ही शासकीय मदत देखील या कुटुंबातील वारसांना तात्काळ मिळवुन देऊ असा विश्वास माजी खासदार ,शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
खेड तालुक्यात बुधवारी (दि ३) झालेल्या चक्री वादळाने अनेक गावांत सार्वजनिक व वैयक्तीक इमारती, मालमत्ताचे नुकसान झाले.तालुक्याच्या पश्चिम भागातील वहागाव येथे घर पडुन मंजाबाई अनंता नवले,वय ६५ यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा नारायण अनंत नवले,वय ३८ याचे गुरुवारी (दि ४) सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत होती. माजी खासदार आढळराव पाटील यांनी वहागाव येथे गुरुवारी दुपारी भेट देऊन या परिवाराचे सांत्वन केले. कर्त्या व्यक्तीची भेट घेऊन त्यांना २५ हजार रुपयांची मदत आढळराव पाटील यांनी केली. आढळराव पाटील यांच्या दौऱ्या दरम्यानच यांनी भागात भेट देऊन पंचनामा करण्यासाठी आदेश दिले.
चौकट १
खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळा, १८ पेक्षा जास्त अंगणवाड्या आणि अडीच हजार पेक्षा जास्त घरे, मंदिर, स्मशानभूमी,जनावरांचा गोठा आदींचे छत उडुन नुकसान झाले. २०० हुन अधिक विद्युत खांब उन्मळून पडले आहेत .अनेक झाडे जमीनदोस्त झाली. जोरदार वाऱ्याने आंब्याच्या सर्व कैऱ्या, आंब्याचा सडा जमिनीवर पडला होता. उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.
चौकट २
तालुक्यातील नुकसानीची पाहणी व पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना शासनाने तात्काळ भरीव मदत करावी.तालुक्यातील खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नावलकिशोर राम यांच्याकडे केली. आमदार मोहिते पाटील यांनी डेहणे परीसरात पाहणी केल्याचे बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी सांगितले.