पुणे – “निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांना बसला आहे. झाडपडी आणि विद्युत खांब ठिकठिकाणी कोसळले असून, 57 अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या 31 शाळा आणि चार ग्रामपंचायतींचे नुकसान झाले. साधारण आंबेगाव, खेड, भोर, मावळ, मुळशी, जुन्नर, हवेली या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
आंबेगाव, जुन्नर, मुळशी, हवेली, मावळ, भोर आणि खेड या तालुक्यांतील सर्वाधिक 57 अंगणवाड्यांचे नुकसान झाले. त्यामध्ये अंगणवाड्यांचे छताचे पत्रे उडून जाणे, भिंत कोसळणे असे प्रकार घडले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अंगणवाड्या बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या 31 शाळांचे पत्रे उडाली आहेत. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्याशिवाय या भागातील चार ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सीईओ यांनी दिली.
याशिवाय भोर तालुक्यातील राजमाची या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील बहुतांश घरांचे छत उडून गेले आहेत. अनेक कौलारू, पत्र्याच्या घरांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्यात दोनशे ते अडीचशे विद्युत खांब पडल्यामुळे विजपुरवठा बंद झाला आहे. परंतु, अशा परिस्थितीतही विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी गेल्या 24 तासांत शक्य तितके पोल व्यवस्थित करून टप्याटप्प्यात विजपुरवठा सुरू केला. धरण क्षेत्रातील परिसर सोडला तर अन्य तालुक्यातील 80 टक्के वीजपुरवठा सुरळीत सुरू केला आहे.
– फुलचंद फड, उपकार्यकारी अधिकारी, मुळशी