वाल्हे – वाल्हे (ता. पुरंदर) येथील परिसरातील शेतकऱ्यांचा यावर्षीचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून जात असल्याने, शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून मान्सूनपूर्व पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने पेरणीपूर्व मशागती होऊनही पाऊस वेळेवर न झाल्याने पिकांच्या उत्पन्नात विपरित परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या बळीराजाला आता हवामान खात्याकडून व त्याचबरोबर प्रत्यक्षात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे आता चिंताग्रस्त आहे.
पेरणीयोग्य पाऊस पडावा, अशी आशा मनी बाळगून बळीराजा हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, 13 जुलै ही तारीखही उलटून गेली; मात्र, पेरणीयोग्य पाऊस पडण्याचे काही चिन्हे दिसत नसल्याने खरिपाच्या बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग, तूर, मका आदी पिकांच्या पेरण्या रखडल्या गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सद्यःस्थितीत शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. यंदा वेळेवर व मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक व काही जाणकारांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे सुरू केली होती. त्याचबरोबर पैशाची जमवाजमव करून बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली आहे.
पेरणी लांबल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण गणितच बिघडलेले आहे. दरम्यान, पेरणीयोग्य पाऊस या आठवड्यात झाला नाही तर, खरीप हंगाम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याचे वाल्हे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे मत आहे.
पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून ठेवली आहे. अजून पाऊस झाला नसल्याने चिंता वाढत आहे. पेरणीयोग्य पाऊस कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हातउसनवारी अंगलट येणार?
बाजरी, मका, सोयाबीन, तूर आदी खरीप पिकांची पेरणी शेतकरी पाऊस पडताच करीत असतो. मात्र, जुलै महिना अर्धा संपला तरी पेरणीयोग्य पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यातच पैशांची जुळवाजुळव करून काही शेतकरीवर्गाने उसणे पैसे घेऊन, बियाणांची खरेदी केली आहे. पेरणीयोग्य पाऊस पडला नाही तर हात उसणे घेतलेले पैसे कसे फेडायचे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पाऊस पडला नाही तर शेतकरी अजूनच कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे.