आगाऊ विमा भरपाई रक्कम देण्यासाठी हालचाली सुरू
रांजणी – पुणे जिल्ह्यात खरीप पिकाचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पीक वाढीच्या अवस्थेत मान्सून न आल्यामुळे जिल्ह्यात काही मंडलांमध्ये उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा कमी येणार आहे, त्यामुळे जिल्ह्यात मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
यंदा चालू वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पावसातील खंड पडल्यामुळे काही मंडलांमध्ये पिकांच्या सरासरी उत्पादकतेत पन्नास टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता आहे. या स्थितीला विमा योजनेच्या कामकाजात मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती असे म्हटले जाते. अशी स्थिती जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात प्रतिकूल स्थिती उद्भवल्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे.
यंदा पावसाअभावी खरीप हंगामात मूग, उडीद, ज्वारी आणि बाजरीचे काही क्षेत्र कमी झाले आहे आणि ते सोयाबीनकडे वर्ग झाले आहे. सध्या सोयाबीनचे पीक शेंगा भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. भाताच्या लागवडी उशिरापर्यंत चालू होत्या, त्यामुळे भाताला आता फुटवे फुटणे ते निसवण्याच्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे.
शासनाने पहिला हप्ता अदा केल्यानंतरच भरपाई
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जाहीर झालेल्या जिल्ह्यात सरसकट विमा भरपाई सर्व शेतकऱ्यांना देण्याची तरतूद नाही. अधिसूचना जारी झालेल्या अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पीक उत्पादक शेतकऱ्यांनाच भरपाईचा लाभ मिळतो. या मंडळांमध्ये विमा संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने तात्काळ द्यावी लागते. मात्र, राज्य शासनाने विमा अनुदानाचा पहिला हप्ता विमा कंपनीला दिला असेल तरच ही भरपाई द्यावी अशी अट आहे, त्यामुळे शासनाने पहिला हप्ता अदा केल्यानंतरच शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकेल.
यंदा 91 टक्क्यांच्या पुढे पाऊस बरसला
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार 1 जून ते 1 ऑक्टोबर दरम्यान सरासरी 1011 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. यंदा तो 926 मिलिमीटर म्हणजेच 91 टक्केच्या पुढे बरसला. गेल्या हंगामात याच कालावधीत पाऊस 113 टक्के झाला होता. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे टक्केवारी वाढल्याचे दिसत असले तरी जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील काही मंडलांमधील खरीप पिकांच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.