पुणे – सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कोथिंबीरवगळता पालेभाज्यांची आवक नेहमीच्या तुलनेत केवळ 30 टक्केच झाली आहे. तर, कोथिंबिरी मात्र निम्मी आवक होत आहे. त्यातच सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यामुळे पालेभाज्यांना मागणी वाढली आहे.
सध्या घाऊक बाजारात दहा दिवसांत भावात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारातही भावात तेजी निर्माण झाली आहे. किरकोळ बाजारात 25 ते 50 रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे.
कोथिंबीर आणि मेथीला सध्या सर्वाधिक मागणी आहे. कोथिंबिरीची पुण्यासह लातूर, नाशिक आणि कर्नाटकसह बंगळुरू जिल्ह्यांतून आवक झाली आहे. मंगळवारी 80 हजार जुडी आवक झाली. ही आवक नेहमीच्या तुलनेत निम्मी आहे. तर मेथीची 20 हजार जुडी आवक झाली. ही आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी असल्याने मेथीला पालेभाज्यांमध्ये सर्वाधिक भाव मिळत आहे. उर्वरित पालेभाज्यांची कमी आवक होत आहे. त्यामुळे भाव जास्त मिळत आहे.
पितृपंधरवाड्यामुळे पालेभाज्यांना मागणी आहे. त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने भाव वाढले आहेत. पुढील 15 दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे. – राजेंद्र सूर्यवंशी, व्यापारी, मार्केट यार्ड
पालेभाजी आणि घाऊक भाव (प्रति जुडी/रु.)
कोथिंबीर – 20 ते 30
मेथी – 30 ते 35
शेपू- 10 ते 25
पालक- 20 ते 25
राजगिरा – 15