खडकवासला(विशाल भालेराव,प्रतिनिधी) :- शिवनेनगर येथील इंगळे कॉलनी आणि देशमुख वाडी परिसरातील सांडपाण्याच्या वाहिनीचे काम लोकसंख्येच्या तुलनेत चुकीचे असून नागरिकांकडून याबदल नाराजी व्यक्त होत आहे तर अधिकाऱ्यांकडून पुढील पंचवीस वर्षे म्हणजे 2047 पर्यंत नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएच्या परिसरातून वाहत येणारा ओढा शिवनेनगर येथील इंगळे कॉलनी देशमुख वाडी परिसरातून वाहत पुढे नदीला मुठा नदीला मिळतो. गेल्या पंधरा-वीस वर्षात या परिसरामध्ये अनेक ग्रह संकुल उभे राहिले आहेत.
यामध्ये साधारण या परिसरामध्ये पाच ते सात हजार सदनिका आहेत. तर वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या आहे. या ग्रह संकुलातील सर्व सांडपाणी या ओढ्यात येऊन मिळते तर एनडीएतील पावसाळ्यातील मोठ्या पाण्याचा लोंढा या ओढ्यातूनच वाहत नदीला मिळतो.
– मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे केलं काम
– लोकसंख्येच्या तुलनेत 18 इंच व्यासाच्या वाहिनीचे काम
– माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे यांचा आरोप
या ओढ्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने शिवने गावाचे महापालिकेत समावेशननंतर पाच वर्षात प्रथमच सांडपाण्याच्या वाहिनीचे काम करण्यात आले. साधारण 300 ते 500 फूट लांबीचे आणि 18 इंच व्यासाच्या वाहिनीचे काम मागील चार-पाच दिवसात झाल्याचे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, लोकसंख्येच्या तुलनेत ही वाहिनी लहान असून आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे सांडपाण्याच्या वाहिनीचे काम केले आहे. याचा फटका ओढ्याच्या कडेने असलेल्या सदनिकांना बसणार असून पावसाळ्यात गृह संकुल धारकांना मोठ्या नुकसानीला सामोरा जाण्याचा धोकाही आहे. याविषयी संबंधित अधिकारी उमेश कुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील 25 वर्ष म्हणजे 2047 सालापर्यंतचे लोक संख्येचा विचारात घेऊन केलेल्या अहवालानुसार या वाहिनीचे काम करण्यात आले असल्याचे सांगितले.
असे असले तरी एकंदरीतच महापालिकेचा अहवाल हा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे स्पष्ट असून येत्या पावसाळ्यातच केलेल्या सांडपाण्याच्या वाहिनीसाठी केलेला खर्च पाण्यात जाऊन कर रूपाने जमा केलेल्या लोकांच्या पैशाची उधळपट्टीच झालेली असेल.