मंचर -कळंब (ता. आंबेगाव) येथील घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर लावण्यात आलेले लोखंडी ढापे जीर्ण झाले असून ते कुजल्यामुळे ढाप्यांमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. बंधाऱ्यावर नवीन ढापे बसवावेत, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बंधाऱ्यातून पाणी वाया जात असल्याने भविष्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाळा तीव्र झाला आहे, त्यामुळे पाण्याची बचत करण्याची गरज आहे. या गळती होणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे जलसंपदा विभागाने ताबडतोब लक्ष देणे गरजेचे असून, भविष्यात शेतकरी आणि नागरिकांचे होणारे पाण्याचे नुकसान लक्षात घेता जलसंपदा विभागाने लवकरात लवकर कारवाई करणे गरजेचे आहे.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर नवीन ढापे बसवावेत आणि पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून जोर धरीत आहे.