नवी दिल्ली -बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी स्वतंत्रपणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. त्या भेटीने विरोधक ऐक्याच्या प्रयत्नांना केजरीवाल यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ती घडामोड विरोधकांना एकत्र आणण्यासाठी होत असलेल्या हालचालींच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक मानली जात आहे.
केजरीवाल यांच्या निवासस्थानी नितीश आणि तेजस्वी यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर केजरीवाल आणि नितीश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देश सध्या अतिशय कठीण काळातून जात आहे. सध्याचे केंद्र सरकार आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे. कौटूंबिक खर्च भागवणेही सामान्य जनतेला अवघड जात आहे.
त्यामुळे केंद्रातील सरकार बदलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आणि देशातील जनतेने एकत्र येणे गरजेचे बनले आहे. विरोधकांच्या ऐक्यासाठी नितीश प्रयत्न करत आहेत. मी पूर्णपणे त्यांच्या सोबत आहे, अशी भूमिका केजरीवाल यांनी मांडली. नितीश यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. त्यांची उत्तरे केवळ एका भेटीनंतर देता येऊ शकणार नाहीत. आम्ही जसजसे पुढे जाऊ; तसतशी तुम्हाला उत्तरे देऊ, असे केजरीवाल यांनी म्हटले.
काही काळापूर्वी माझे केजरीवाल यांच्याशी बोलणे झाले. त्यांना पुन्हा भेटलो. अधिकाधिक विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे आम्ही ठरवले आहे, असे नितीश यांनी नमूद केले. याआधी विरोधकांच्या ऐक्याविषयी केजरीवाल फारसे अनुकूल वाटत नव्हते. मात्र, नितीश, तेजस्वी यांच्या भेटीनंतर विरोधक एकजुटीसाठी तेही राजी असल्याचे सूचित होत आहे.