नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल सोमवारी सातव्यांदा ईडीसमोर गैरहजर राहिले. न्यायालयाने आदेश दिल्यास ईडीपुढे हजर राहू, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी त्या केंद्रीय यंत्रणेने सहावेळा समन्स बजावूनही केजरीवाल हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना सातव्यांदा समन्स बजावण्यात आले.
मात्र, केजरीवाल यांनी पुन्हा ईडीसमोर हजर राहण्याचे टाळले. त्याविषयी भूमिका मांडताना केजरीवाल यांनी केंद्र सरकार आणि ईडीचा न्यायालयावर विश्वास नाही का, असा सवाल केला. मी गैरहजर राहत असल्यावरून ईडीनेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जावी, असे ते म्हणाले. इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याच्या उद्देशातून समन्सचा वापर केला जात आहे. मात्र, आप त्या आघाडीतून बाहेर पडणार नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली. ईडीकडून पाठवले जाणारे समन्स अवैध असल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.