नवी दिल्ली – इंडिया आघाडीने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे अशी आपली वैयक्तीक इच्छा आहे असे या पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी पीटीआला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तथापि त्या विषयीचा निर्णय आपल्या हातात नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की केजरीवालांनी जे दिल्ली मॉडेलचे प्रशासन दिले आहे, तसे मॉडेल ते संपुर्ण देशभर लागू करू शकतात त्याचा देशाला मोठा लाभ होऊ शकतो. दिल्लीतील लोकांना केजरीवालांनी अनेक मोफत सवलती आणि भरीव योजना देऊनही त्यांनी दिल्लीचे सरप्लस बजेट दिले आहे. नफ्यातले अंदाजपत्रक सादर करणारे दिल्ली हे एकमेव राज्य आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की सन 2024 च्या निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी एक भक्कम आघाडी उभी करण्याची गरज आहे. ती गरज इंडिया आघाडीमुळे पुर्ण होऊ शकते. इंडिया आघाडीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा या प्रश्नावर कक्कर म्हणाल्या की, “एक प्रवक्ता म्हणून मी आमचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा प्रस्ताव देईन.
आपचे दिल्ली संयोजक गोपाल राय म्हणाले, “प्रत्येक पक्षाला त्यांच्या नेत्याने पंतप्रधान व्हावे असे वाटते. आपच्या सदस्यांनाही त्यांचा राष्ट्रीय संयोजक पंतप्रधान व्हावा, असे वाटते. मात्र या विषयावर इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि तो जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू.