वाघोली\आळंदी – बहिण भावाचं अतूट प्रेम आणि नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन.. या सणानिमित्त वाघोलीतील संपत आबा गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे.
वारकरी मंडळी हे ज्ञानेश्वर माऊलींना आपला देव, माय, बाप, बहीण, भाऊ असं सर्व काही समजतात. अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील संपत आबा गाडे या वारकरी कुटुंबीयांनी सोन्याची राखी ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.
तसेच यंदा पडलेल्या दुष्काळातून राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा आर्थिक दिलासा मिळू दे आणि शेतकऱ्यांची सुख, शांती आणि समृध्दीने भरभरून प्रगती होऊ दे, अशी मागणी देखील गाडे कुटुंबीयांनी कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींकडे केली आहे. यावेळी भीमाबाई गाडे, संपत आबा गाडे, स्नेहा गाडे, राज गाडे, माऊली मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.