नवी दिल्ली : पंजाबी सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेस सरकार राज्यातील आप सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहे. दुसरीकडे, अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी मुख्यमंत्री भगवंत मान अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘अरविंद केजरीवाल दिल्लीतून दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात’, असा गंभीर आरोप सुखबीर सिंग यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीतून पंजाबचे सरकार चालवतात. केजरीवाल दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात, तसेच तुम्ही सरकारी कार्यालयात बसून मजा करा सरकार मी चालवतो असे केजरीवाल मान यांना म्हणत असल्याचेही सुखबीर सिंग म्हणाले. तसेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूलाही आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप सुखबीर सिंग यांनी केला आहे.
आप सरकारने मुसेवालाची सुरक्षा काढून घेतली त्यामुळे त्याचे शत्रू सावध झाले आणि तो मेला, असे सिंग म्हणाले. याआधी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला अंतर्गत कलहाचा फटका बसला आणि याचा फायदा आप पक्षाला झाला. भाजपा आणि अकाली दलासारख्या बलाढ्या पक्षाला हरवून पंजामध्ये पहिल्यांदाच आपचे सरकार स्थापन झाले. आप चे नेते भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.