नवी दिल्ली –दिल्ली पालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याची सूचना राज्य निवडणूक आयुक्तांना फोनवरून देण्यात आली. तो फोन कॉल पंतप्रधान कार्यालयातून आला. जगात कुठेच असे घडले नसेल, अशी टिप्पणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी केली.
दिल्लीत सध्या तीन महापालिका आहेत. त्या पालिकांच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर टाकण्यात आली. तिन्ही पालिकांचे विलिनीकरण करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलल्याने तसे घडले. त्यावरून दिल्लीतील सत्तारूढ आपकडून केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला लक्ष्य केले जात आहे. त्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनीही विधानसभेत बोलताना भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.
दिल्ली पालिकांच्या निवडणुका वेळेत घेऊन भाजपने त्या जिंकून दाखवाव्यात. भाजप स्वत:ला जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणवतो. मात्र, तो पक्ष आपसारख्या छोट्या पक्षाला घाबरत आहे. दिल्ली पालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्या पक्षाच्या नेत्यांनी पालिकांमधील लुटीचे सर्व विक्रम मोडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.