नवी दिल्ली – करोनाचा मुकाबला करण्यासाठी दिल्ली सरकारने मंगळवारी “5 टी’ योजना जाहीर केली. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर चर्चा करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीमवर्क आणि ट्रॅकिंग ऍन्ड मॉनिटरींग या पाच मुद्दयांच्या आधारे ही योजना राबवली जाणार आहे. म्हणूनच या योजनेला “5- टी’ योजना म्हटले गेले आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
सध्याच्या स्थितीमध्ये टेसिंटग म्हणजेच चाचणी केल्याशिवाय कोणाला संसर्ग झाला आहे, हे समजू शकणार नाही. संसर्ग झालेल्यांकडून मोठ्या प्रमाणावर फैलाव होत राहील. त्यासाठी व्यापक प्रमाणावर चाचण्या घेणे गरजेचे आहे. त्यासाठी 50 हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी टेसिंटग किटची ऑर्डर देण्यात आली आहे. ही किट उपलब्ध व्हायला लागली आहेत. आता पुढच्या काळात 1 लाख लोकांच्या चाचण्यांसाठी किटची ऑर्डर दिली गेली असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
ज्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे, त्यांचा माग काढून विलगीकरण केले जात आहे. आता त्यासाठी पोलिसांची मदतही घेतली जात आहे. याशिवाय 27 हजार नागरिकांच्या हालचालींवर त्यांचा मोबाईल नंबरच्या आधारे देखरेख केली जात आहे. मरकझमधून आलेल्या 2 हजार लोकांनाही त्यांच्या मोबाईल नंबरच्या आधारे शोधले गेले आहे आणि त्यांनी जिथे भेट दिली होती, तो भाग सील केला गेला आहे.
दिल्लीमध्ये सध्या 525 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 1 हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जे बरे झाले त्यांच्यावरही देखरेख केली जात आहे. करोनावर सामूहिक प्रयत्नांशिवाय विजय मिळवला जाऊ शकणार नाही. यासाठी सर्वच गटांचे प्रयत्न आवश्यक आहेत. राजकारण वगळून “5 टी’ची अंमलबजावणी केली जात आहे.