नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संबंधित घडामोडींचा बहुतांश विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनीही राहुल यांच्या समर्थनासाठी आवाज उठवला.
भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त करणाऱ्यांमध्ये ममता आणि केसीआर यांचाही समावेश आहे. मात्र, विरोधकांच्या संभाव्य आघाडीमध्ये कॉंग्रेसला सामावून घेण्यास ते अनुकूल नाहीत. त्या पार्श्वभूमीवर, राहुल यांच्या पाठिशी ममता आणि केसीआर उभे राहिल्याचे महत्व वाढले आहे. मात्र, त्या दोघांनीही प्रतिक्रिया देताना राहुल यांचा नामोल्लेख टाळला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव भारतात विरोधी पक्षांचे नेते भाजपचे मुख्य टार्गेट बनले आहेत. भाजपच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागते. तर, विरोधी पक्षांच्या नेत्यांना वक्तव्यांबद्दल अपात्र ठरवले जाते. आज आपण देशाच्या घटनात्मक लोकशाहीच्या दृष्टीने खालची ठरणारी नवी पातळी अनुभवली, असे ट्विट ममतांनी केले. तर, केसीआर यांनी निवेदन जारी करून भूमिका मांडली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजच्या दिवसाची नोंद काळा दिवस म्हणून होईल. विरोधी पक्षांच्या नेत्यांना अपात्र ठरवून मोदी स्वत:च्या अध:पतनाला निमंत्रण देत आहेत, अशी टीका केसीआर यांनी केली.