सांगली, दि. 24- पहिल्या-वहिल्या “महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात रंगला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सांगलीची प्रतीक्षा बागडी हिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली “महिला महाराष्ट्र केसरी’ होण्याच बहुमान पटकाविला. प्रतीक्षा आणि वैष्णवीमध्ये झालेला अंतिम सामना थरारक राहिला. वैष्णवीने सलग 4 गुण मिळवले. मात्र, पुढच्याच डावात प्रतीक्षाने वैष्णवीला चितपट करत सामना संपवला आणि मानाची चांदीची गदा उंचावली.
तत्पुर्वी, सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रतिक्षा हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिचा 9 विरूध्द 2 गुणांनी पराभव करीत अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तर, दुसऱ्या कुस्तीमध्ये वैष्णवीने वैष्णवी कुशाप्पाचा 11 विरूध्द 1 अशा गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल 45 जिल्ह्यांच्या 450 हून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला होता. हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 किलो वजनी गटातील महिला मल्ल सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र केसरीसाठी 65 किलो वजनी गटावरील मल्लांमध्ये किताबासाठी लढत झाली. लाल मातीवरील खेळ अशी ओळख असणारी ही स्पर्धा केवळ मॅटवरच पार पडली.
बिल न भरल्याने स्पर्धा अंधारात
पहिल्याच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. विजेचे बिलच न भरल्याने सामने चालू असलेल्या सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर अंधारात होत. विशेष म्हणजे स्पर्धेचे सामने चालू झाल्यानंतरही संकुल परिसर अंधारातच होता. ज्यामुळे राज्यभरातील सहभागी महिला मल्लांना अंधारातून वाट काढावी लागली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 400 ते 450 मुलींची यामुळे मोठी गैरसोय झाली.