श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात पुन्हा काश्मिरी पंडित आणि हिंदुंना लक्ष्य करून त्यांच्या हत्या करण्याचा प्रकार वाढला असून या घृणास्पद प्रकारांचा श्रीनगरातील ग्रॅंड मुफ्ती नसीर उल इस्लाम यांनी निषेध केला आहे. या प्रकाराची कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली असून त्यांनी लोकांना काश्मीर खोऱ्यातील बंधुभावाचे वातावरण कायम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच काश्मिरी पंडितांनी किंवा हिंदुंनी येथून निघून न जाता आमच्या सोबतच राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
खोऱ्यात दहशतवाद्यांनी अलीकडेच केलेल्या हत्यांबद्दलही त्यांनी वेदना व्यक्त केल्या आणि म्हणाले की, काश्मीरमध्ये मानव आणि मानवतेचे रक्त स्वस्त झाले आहे.
ते म्हणाले की, केवळ इस्लामच नव्हे तर प्रत्येक धर्मात प्रत्येक माणसाच्या सुरक्षेवर भर दिला जातो. जर एखादी समस्या असेल तर ती सोडवायला हवी. पण रक्त सांडून त्यावर उपाय शोधणे हे मानवतेच्या विरोधात आहे. काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या लोकांची सुरक्षा ही स्थानिक रहिवाशांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक हत्या निंदनीय आहे आणि तो एक घृणास्पद गुन्हा आहे. मला अशा हत्यांबद्दल वेदना होत आहेत. लोकांना हे समजायला हवे आहे की आपण समुदायांमध्ये बंधुभाव राखला पाहिजे. आपण बदमाशांना अविश्वासाचे वातावरण निर्माण करू देऊ नये,”असेही त्यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अशा गोष्टींमागे कोण आहे हे शोधण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल. प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे असेही ते पुढे म्हणाले.
काश्मिरी पंडितांचा संदर्भ देत त्यांनी खोऱ्यातून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही गेल्या 30 वर्षांपासून काश्मीरी पंडित काश्मीर खोऱ्यात परत यावेत असे ओरडून सांगत होतो. आता ते परत आले आहेत तर त्यांना शांततेने आणि सन्मानाने येथे राहू दिले पाहिजे असे ते म्हणाले.