नवी दिल्ली -कर्नाटकमधील विजयाचे श्रेय कॉंग्रेसने भारत जोडो यात्रेलाही दिले आहे. त्या यात्रेने कर्नाटकातील 20 विधानसभा मतदारसंघांमधून प्रवास केला. त्यातील 15 मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये यात्रेचा इम्पॅक्ट झाल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे.
यात्रेने मार्गक्रमण केलेल्या उर्वरित 5 पैकी 3 मतदारसंघांमध्ये जेडीएसने, तर 2 मतदारसंघांत भाजपने विजय मिळवला. मागील निवडणुकीत संबंधित मतदारसंघांपैकी केवळ 5 ठिकाणी कॉंग्रेसला यश मिळाले होते. त्यावेळी भाजपने 9 तर जेडीएसने 6 ठिकाणी विजय मिळवला होता.
त्या आकडेवारीचा आधार घेऊन कॉंग्रेसने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्राही पक्षाच्या सरस कामगिरीसाठी कारणीभूत असल्याची भूमिका घेतली आहे. ती यात्रा कर्नाटकमध्ये 22 दिवस होती.