कराड शहर शिक्षणाचे हब बनले आहे. सर्व प्रकारचे अभ्यासक्रम शिकण्याच्या सुविधा कराड व परिसरात उपलब्ध आहेत. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून कराडची ओळख आता अधिक ठळक बनत चालली आहे. कराड शहरातील नगरपालिकेची प्राथमिक शाळा क्रमांक तीन राज्यात आदर्श बनली आहे. म्हणजेच प्राथमिक शिक्षणापासून ते कृषी, औषधनिर्माण, व्यवस्थापनशास्त्र, वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारख्या उच्च शिक्षणापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी इथे दूरदूरचे विद्यार्थी येतात. म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रातील कराड अधिक समृद्ध होत चालले आहे…
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून या परिसरात शिक्षणाची गंगोत्री सुरू झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेकविध अभ्यासक्रम येथे सुरू होण्यास सुरवात झाली. रयत शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणाची घेतलेली भूमिकाही पूरक ठरली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कराडजवळ सैदापूर येथे 1954 मध्ये सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी 1958 ला कऱ्हाडला शासकीय तंत्रनिकेतन स्थापन केले. त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली. शासकीय तंत्रनिकेतन पाठोपाठ शासकीय अभियांत्रिकी, शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाची स्थापना झाली. सैदापूरच्या शिक्षण संकुलात यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, वेणूताई चव्हाण महाविद्यालयांची भर पडली.
त्यामुळे कराडची विद्यानगरी म्हणून सैदापूर नावारूपास आले. विद्यानगर होण्यात सैदापूरमधील शेतकऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. सैदापूर हद्दीत असलेल्या सुमारे 15 शिक्षण संकुलांना शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीमुळेच विद्यानगर उभारले गेले आहे. बदलत्या शिक्षण पध्दतीत अनेक शिक्षण संस्थांनी इंग्लिश मिडीयम स्कूलचीही स्थापना केली आहे. विद्यानगरलगत बनवडीच्या माळावर डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाल्याने विद्यानगरीचे विस्तार वाढला. होली फॅमिली स्कूल, लिगाडे- पाटील महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय यामुळे विद्यानगरचे संकुल संपन्न होऊ लागले.
सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचा गेल्या काही वर्षांपासून बदललेला कार्पोरेट लुक तसेच या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगकडून मिळालेला स्वायत्त दर्जा कराडच्या शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवणारा आहे. गुणवत्ता अधिक चांगली होण्यासाठई या महाविद्यालयाने प्रयत्न केलाच. त्याशिवाय या महाविद्यालयाने बाह्यरूपही बदलले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयालाही त्यापूर्वीच स्वायत्त दर्जा मिळाला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासह कर्मवीर भाऊराव पाटील व ज्येष्ठ नेते कै. पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टीमुळेच हे शिक्षणक्षेत्रात कराडला वेगळी ओळखमिळाली. नंतरच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून शासकीय कृषी महाविद्यालय झाले. तसेच ओगलेवाडी येथे भूकंप संशोधन केंद्र मंजूर झाले. या नव्या जुन्या संस्थांमुळे शिक्षण क्षेत्रात कराडचे नाव सर्वदूर गाजत गेले.
कराडमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराड शिक्षण मंडळ, जनकल्याण प्रतिष्ठान, शिशु शिक्षण संस्था व इतर संस्थांच्या शाळा, महाविद्यालयांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कराड शिक्षण मंडळानेही बालवाडी, केजीपासून ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय देताना नवीन शिक्षक निर्मितीसाठी अध्यापक महाविद्यालय सुरू केले. त्यात नूतन मराठी, पूर्व प्राथमिक, एसएमएस स्कूल, महिला महाविद्यालय, लाहोटी कन्या विद्यालय यांचा समावेश आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय, विठामाता विद्यालय, वेणूताई चव्हाण महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयांनीही शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. या संस्थांतील अनेक माजी विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी, नामवंत राजकारणी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वावर मजल मारली आहे. खासगी शिक्षण संस्थांपोठोपाठ स्पर्धात्मक शिक्षणाप्रवाहात टिकण्यासाठी कऱ्हाड पालिकेच्या शाळाही मोठे प्रयत्न करीत आहेत.
पालिका शाळा क्रमांक तीन या शाळेला राज्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त शाळा बनण्याचा मान मिळाला आहे. या शाळेत सध्या सर्वाधिक सुमारे 2100 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तसेच पालिका शाळा क्रमांक नऊ, सात, बारा याही शाळा आयएसओ मानांकन प्राप्त केल्या आहेत.
गुणवत्ता टिकवण्यासाठी शाळां मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. भारती विद्यापीठाने यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय तसेच यशवंतराव मोहिते व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय सुरू केले आहे. घोगाव येथे संतकृपा शिक्षण संस्था, उंडाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्था आदींसह ग्रामीण भागातील लहानमोठ्या संस्थांची शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी लक्षात घेण्यासारखी आहे. कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयामुळे वैद्यकीय शिक्षणासाठीही कराडची ओळख मोठी बनली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने विजयनगरला शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाले. केंद्रीय मंत्रिपदाच्या कार्यकाळात चव्हाण यांनी ओगलेवाडी येथे मंजूर केलेल्या आंततराष्ट्रीय स्तरावरील भूकंप संशोधन केंद्रामुळे कराडची ओळख जागतिक पातळीवर होणार आहे. त्यामुळे बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक शाखांमधून शिकणारा कराडमधील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत भक्कमपणे उभा राहत आहे. त्यामुळेच भविष्यातही कराड हे आधुनिक युगातील शेक्षणिक हब होईल आणि इथे शिकणारा विद्यार्थी ज्ञानाच्या क्षेत्रात कराडचे नाव उज्ज्वल करेल, यात शंका असण्याचे कारण नाही.