हैबतबाबा पायरी पूजनाने माऊलींच्या समाधी सोहळ्यास सुरुवात
आळंदी – एम. डी. पाखरे/ ज्ञानेश्वर फड
चला आळंदीला जाऊ ।
ज्ञानेश्वर डोळा पाहू ।।
होतील संतांचिया भेटी।
सांगू सुखाचीया गोष्टी ।।
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखी म्हणता चुकती फेर ।।
जन्म नाही रे आणिक।
तुका म्हणे माझी भाक ।।
संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रेला गुरुवारी (दि. 17) श्रीगुरू हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने सुरुवात झाली. रविवार (दि. 20) कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) तर मंगळवारी (दि. 22) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. गुरुवारी सकाळी प्रथापरंपरेने हैबतबाबा यांचे वंशज प्रतिनिधी बाळासाहेब पवार, राजाभाऊ पवार कुटुंबीयांच्या हस्ते अवधूत गांधी कुलकर्णी गुरुजी व इतर वेदमूर्तींच्या प्रथमोपचाराने विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी माऊली देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ऍड. विकास ढगे, माऊलींचे मानकरी विठ्ठल घुंडरे, प्रदेश प्रतिनिधी डी. डी. भोसले पाटील, माजी आमदार रामभाऊ मोझे, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर गुंळूंजकर, अजित मधवे, भीमराव घुंडरे, मारुती कोकाटे, राहुल चिताळकर, ऍड. विष्णू तापकीर, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, प्रकाश जाधव, मच्छिंद्र शेंडे, प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर, निलेश वीर, माऊली निळे आदींसह आळंदीकर नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांडुरंगराय दिंडीचे आगमन
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशीला राज्यभरातून भाविक, वारकरी येतात. त्याचप्रमाणे अनेक संतांचे पालखी सोहळेदेखील येतात. संत नामदेव महाराज आणि श्री पांडुरंग पालखीला विशेष महत्त्व आहे. नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा बुधवार (दि. 16) अलंकापुरीत दाखल झाला असून श्री पांडुरंगराय पालखीचे गुरुवार (दि. 17) सायंकाळी हरिनाम गजरात आगमन झाले. यावेळी देव आणि संत भेट झाली. राज्यातील सर्व देव आणि संतांचे पालखी सोहळे अलंकापुरीत दाखल होत आहेत.
माऊली मंदिरात आजचे धार्मिक कार्यक्रम
कार्तिक वद्य नवमीदिवशी माऊली मंदिरात पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. सायं. 6.30 ते 8.30 बाबासाहेब देहूकर यांच्यावतीने वीणा मंडपात कीर्तन. रात्री 8.30 ते 9 धुपारती. रात्री 9.30 ते 11 बासकर महाराज यांच्यावतीने वीणा मंडपात कीर्तन. हरिजागर आदी कार्यक्रम होतील.
ठिकठिकाणी हरिनाम सप्ताह
वारकरी, भाविक आता आळंदीत दाखल होत असून ठिकठिकाणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक कीर्तन, भजन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम श्रावणाचा आनंद घेत आहेत. आळंदीत चोहीकडे हरिनामाचा गजर ऐकू येत आहे. विश्रांतवड परिसर, सिद्धबेट, गोपाळपूरा, वडगाव रास्ता, मरकल रस्ता, देहूफाटा, पुणे रस्ता आदी भागात विविध धर्मशाळांमध्ये हरिनाम सप्ताह सुरू झाले आहेत.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मुख्य यात्रा कार्तिकी एकादशी रविवारी असली तरी आजपासून सोहळ्याला सुरुवात झाल्याने हजारो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. माऊलींचे दर्शनासाठी भाविकांची रांग आता इंद्रायणी तीरावर पोहोचली आहे. दर्शनासाठी 5 तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे भाविकांनी सांगितले. ही दर्शन रांग आणि दर्शनासाठी लागणारा वेळ वाढत जाणार आहे.
इंद्रायणी घाट गजबजतोय
यात्रेत ज्या भाविकांची नियोजित ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसते असे भाविक इंद्रायणी घाटावर वास्तव्यास असतात. त्यामुळे दिवसभर घाटावर स्नानासाठी, फोटो काढण्यासाठी तर रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी आलेल्या भाविकांनी इंद्रायणी घाट हळूहळू गजबजताना दिसत आहे. घाटावर कीर्तन भजनाचे कार्यक्रम होतात. याठिकाणी मोठ्या पडद्यावर हे कार्यक्रम दाखविले जातात त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.