सुरेश डुबल
मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष; निकालाचा अंदाज बांधणे कठीण
कराड – कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ऍड. उदयसिंह पाटील यांच्यात लढत होत आहे. या तुल्यबळ लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काहीही करून विजय मिळवायचा चंग उमेदवारांनी बांधला आहे. या निकराच्या लढाईत कोण विजयी होणार, हे निकालादिवशीच स्पष्ट होईल. कारण उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती पाहता आताच कोणताही अंदाज बांधणे कठीण आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयातून 2010 साली राज्यात मुख्यमंत्री म्हणून परतले. त्यानंतर 2014 साली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची वाताहत झाली. तेव्हाच पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे कॉंग्रेस अंतर्गतच वादाची ठिणगी पडली होती.
पस्तीस वर्षे हा मतदारसंघ टिकवून ठेवणारे कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना आपले तिकीट कापले जाणार असल्याची कुणकुण लागली होती. झालेही तसेच. पक्षश्रेष्ठींनी पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही आपल्या गटाच्या जीवावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 2009 साली कराड उत्तरमध्ये पराभव झाल्यानंतर स्वत:च्या मतदारसंघात परतलेल्या अतुल भोसले यांनी भाजपचा झेंडा हातात घेऊन दक्षिणेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळच्या रंगतदार लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला होता.
आता कराड दक्षिणमधील तिन्ही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चुरस वाढली आहे.
कॉंग्रेसची पडझड सुरू असताना पळ काढणे पृथ्वीराज चव्हाणांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी दक्षिणेवर आपली स्वारी कायम ठेवली आहे. अतुल भोसले यांनी 2014 च्या पराभवातून धडा घेतल्याचे दिसत आहे. त्यांनी मागील निवडणुकीपेक्षा प्रचाराचे तंत्र बदलले आहे. पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले यांनीही मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. ऍड. उदयसिंह पाटील यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज भरून विरोधकांना गाफील ठेवले होते. आता मात्र प्रचाराचा शुभारंभ प्रचंड गर्दीच्या साक्षीने करून, “हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले आहे.
आता प्रचारासाठी जेमतेम आठवडा उरला असताना तिन्ही उमेदवारांनी ताकद पणाला लावली आहे. जाहीर सभा, कोपरा सभा, बैठका, मतदारांच्या “होम टू होम’ गाठीभेटी घेण्यावर या तिघांचा भर आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून निकालाचे अंदाज बांधायला सुरुवात झाली होती. निवडणुकीचा प्रचार जसजसा पुढे सरकतो आहे, तसतसे हे अंदाज फोल ठरतील, अशी चिन्हे आहेत. काय होईल, हे कोणालाही सांगता येत नाही. तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याची चर्चा चौकाचौकात, पारांवर रंगत आहे.
अतुल भोसले यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना आपल्या मतदारसंघात प्रचाराला आणण्याची तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात तर अमित शहा यांची कराडमध्ये सभा होणार असल्याने अतुल भोसले यांना ज्यादा ऊर्जा मिळणार आहे. कराड दक्षिणेत मातब्बर निवडणूक लढवत असल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जास्तच झडत आहेत. पावसाने कराड दक्षिणमध्ये धुमाकूळ घातला असला, तरी कट्टर कार्यकर्ते पावसात उभे राहूनच नेत्यांच्या सभांना गर्दी करत आहेत.