एका दिवसात कपील सिब्बल यांचे मतपरिवर्तन
नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायदा (का) हा घटनाबाह्य आहे, असे सांगत अवघ्या 24 तासांत मतपरिवर्तन झाल्याचे कॉंग्रेस नेते कपील सिब्बल यांनी दाखवून दिले. संसदेत मंजूर केला असल्याने त्याला राज्य सरकार नाकारू शकत नाहीत, असे ते काल म्हणाले होते.
सिब्बल यांनी टिवटवर आज भूमिका मांडली. ते म्हणाले, का हा घटनाबाह्य आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. या कायद्याविरोधात ठराव करण्याचा प्रत्येक राज्याला हक्क आहे. तसेच तो रद्दबातल करावा, म्हणून मागणी करण्याचा हक्क आहे. जर या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले तर या कायद्याला विरोध करणे अवघड होईल. तेंव्हा लढा सुरू ठेवा.
केरळ साहित्य महोत्सवात शनिवारी त्यांनी वेगळीच भूमिका मांडली होती. जर का हा मंजूर झाला असेल तर त्याची अंमलबजावणी आम्ही करणार नाही, असे कोणतेही राज्य म्हणू शकणार नाही. ते शक्य नाही आणि घटनाबाह्य आहे. मात्र घटनात्मक दृष्ट्या या कायद्याची अंमलबजावणी शंकास्पद आहे. त्यामुळे अनेक अडचणींत वाढ होणार आहे, असे ते म्हणाले होते.
केरळ सरकारने या आठवड्यात का कायदा घटनाबाह्य असल्याचे जाहीर करावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. केरळ विधानसभेत तसा ठरावही मंजूर केला होता. त्या पाठोपाठ पंजाब विधान सभेनेही ठराव मंजूर केला होता.