मुंबई – अभिनेत्री कंगना रानौतने भारतीय स्वातंत्र्याला भीक संबोधल्याने मोठा वाद पेटला आहे. समाजाच्या विविध स्तरांमधून कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत असून तिला नुकताच प्रदान करण्यात आलेला पद्म पुरस्कार मागे घेण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कंगनाच्या या आक्षेपार्ह्य वक्तव्यावर वाद सुरु असतानाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी या वादात उडी घेत कंगनाची वक्तव्याला समर्थन दिले आहे. गोखले यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता ते देखील टीकेचे धनी ठरताना दिसतायेत.
अशातच आता विक्रम गोखलेंनी कंगना रानौतच्या स्वातंत्र्याला भीक संबोधणाऱ्या वक्तव्याचं समर्थन केल्यावरून अभिनेत्री स्वरा भास्करने त्यांना शालजोडा लगावला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर स्वराने याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात विक्रम गोखलेंनी केलेल्या वक्तव्याचे ट्विट रिट्विट करत ‘लवकरच पद्म पुरस्कार प्राप्त होणार’ असा टोमणा मारला आहे.
दरम्यान, कंगनाने स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलंय. कंगनाला नुकताच प्रदान करण्यात आलेला पद्म पुरस्कार भाजपची चमचेगिरी करत असल्याने देण्यात आलाय असा आरोप नेटकरी करताना दिसतायेत. नेटकरी करीत असलेल्या याच आरोपाचा धागा पकडत स्वराने विक्रम गोखलेंना टोला लगावला आहे.
अभिनेता अतुल कुलकर्णीकडून गोखलेंच्या वक्तव्याची खिल्ली
तत्पूर्वी, गोखलेंच्या वक्तव्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी याने केलेली पोस्ट देखील चांगलीच चर्चेत आली होती. अतुल कुलकर्णीने, “ज्येष्ठता आणि शहाणपण दोन वेगळ्या गोष्टी आहेत.’ असं म्हणत गोखलेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती.
काय म्हणाली होती कंगना?
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगना रानौतने, “१९४७ मिळालं ते भीक होत, खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं.” असं वादग्रस्त विधान केलं होत.
गोखलेंची प्रतिक्रिया…
यावर प्रतिक्रिया देताना गोखलेंनी, “कंगना रानौत जे म्हणाली ते खरं आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलेलं आहे बरं का.” असं विधान केलं.
Padma award coming up 🙏🏽🙏🏽🙏🏽 https://t.co/aB77GOQFNC
— Swara Bhasker (@ReallySwara) November 15, 2021