मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यात 2016 मध्ये मोठा वाद झाला होता. त्यांनी परस्परांवर अनेक आरोप केले होते. त्याच संदर्भात लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाला चर्चा करण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते. त्यावेळी जावेद अख्तर यांनी आपल्याला धमकावले होते असा आरोप नंतर 2020 मध्ये कंगनाने एका मुलाखतीत केला होता. तिच्या आरोपानंतर जावेद अख्तर यांनी तिच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे.
एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मुंबईच्या अंधेरी येथील न्यायालयात जावेद अख्तर यांनी सांगितले की, त्यावेळी ते कंगनाला ओळखतही नव्हते. आमच्या दोघांच्या परिचयाचे असलेले डॉक्टर रमेश आग्रवाल हृतिकच्या विषयावर तिला सल्ला देऊ इच्छित होते. माझी आणि तिची ओळखही नव्हती आणि तिच्या आणि हृतिकच्या वादाशी माझा संबंधही नव्हता.
मात्र डॉ. आग्रवाल आणि कंगना यांचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांनी तिला बोलावले होते. कंगना तेंव्हा माझे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि तिची बहिण रंगोली हिच्यासोबत ती निघून गेली. मात्र माझ्या बोलण्यामुळे ती दुखावली गेली हे खरे नाही.
कंगना आणि तिची बहिण त्यांच्या मर्जीने तेथे आल्या होत्या का, असे जावेद अख्तर यांना विचारल्यावर ते म्हणाले, कंगना आपल्या इच्छेनुसार येऊ शकते अशी तिच्याकडून अपेक्षा केली जाऊ शकते का? ती स्वत:हून आली होती की नाही ते मला माहिती नाही. मात्र तिला काहीतरी तोडगा हवा होता व त्याच अपेक्षेने ती आली होती.
मी तिला फोनवरच मीटिंगचे कारण सांगितले होते. हवामान, राजकीय स्थिती आणि अमेरिकेतील निवडणूक याबाबत चर्चा करण्यासाठी तिला बोलावले नव्हते. जरी मी तिला ओळखत नव्हतो तरी चांगली अभिनेत्री म्हणून मला ती आवडायची. जेंव्हा आपले म्हणणे ती ऐकणार नाही असे मला वाटले तेंव्हाच मी विषय बदलला.
काय होता कंगनाचा अरोप?
जावेद अख्तर यांनी मला हृतिक रोशनची माफि मागण्यास सांगितले होते. राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंब खूप प्रभावशाली आहे. तू माफि मागितली नाही तर पुढे जाऊ शकणार नाही. ते तुला जेलमध्ये टाकतील आणि केवळ विनाशाचाच मार्ग शिल्लक राहील. आत्महत्या करण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय राहणार नाही असे जावेद अख्तर यांनी आपल्याला धमकावले होते असा दावा कंगनाने केला होता. तसेच ते ओरडत होते आणि मी प्रचंड घाबरली होती असेही तिने म्हटले आहे. मात्र कंगना जे काही सांगते आहे ते सगळे खोटे असल्याचे जावेद अख्तर यांनी न्यायालयाला सांगितले.