नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संसदेत यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांनी मदत केल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा आता कलावती यांनी फेटाळून लावला आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी ,’मला मोदी किंवा भाजप सरकारमुळे काहीच मिळाले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं, असे म्हटले आहे.
बुधवारी संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. कलावती यांच्या गरिबीची कहाणी अमित शाह यांनी सांगितली. नंतर त्यांना कुठलीही मदत केली नाही, असा आरोप केला होता. पण, राहुल गांधी कोणत्याही कलावतींना भेटले नाही, असंही शाह यांनी म्हटलं होतं. तर यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदुरकर यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी कलावतींच्या समस्या सोडविल्या असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
राहुल गांधी बुंदेलखंडातील कलावती नावाच्या एका महिलेच्या घरी गेले होते. तिच्या आर्थिक परिस्थितीचे राजकारण करण्यात आले. मात्र वीज, घर, शौचालय, धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा मोदी सरकारने उपलब्ध करून दिल्या, असा दावा अमित शहा यांनी संसदेत बोलताना केला होता. मात्र यवतमाळमधील काँग्रेस नेत्यांनी बुंदेलखंडमध्ये अशा कुठल्याही कलावतींना राहुल गांधी भेटले नसल्याचा दावा केला.
यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदुरकर यांच्या घरी राहुल यांनी भेट दिली होती. यानंतर कलावती या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांना मदत करण्यात आली. कलावती बांदुरकर यांना घर, वीज, पाणी आणि इतर आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली. राहुल गांधी यांच्यामुळे मुळे मला सन्मानाने जगता आले. काँग्रेसने सुख सुविधा पुरवल्या आहे. मोदी सरकारने मला काहीही दिलं नाही. संसदेत जे कुणी बोलले ते खोटं बोलले, असे कलावती यांनी म्हटले आहे.