उत्तम पिंगळे
परवाच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गणेशदर्शन करून आलो. दुसराच दिवस असल्यामुळे प्राध्यापक निवांत होते कारण दीड दिवसाचा गणपती झाल्यावर प्राध्यापकांकडे सर्व मित्रमंडळाच्या गर्दीची सुरुवात होणार. मी प्रसाद व चहा घेतला. प्राध्यापक त्यांच्या बालपणाच्या आठवणी सांगत म्हणाले- माझ्या बालपणी आमच्या घरी गणपती नसायचा, आमच्या चुलत काकांकडे असायचा. पण माझा ओढा असायचा मामाच्या गणपतीकडे जाण्याचा. शाळेला सुट्टी असायची तळकोकणातील तळवली गाव मामाचे.
सर्व चाकरमानी मुंबईत, गावात फक्त म्हातारे व शेतीवर काम करणारे असे लोक असत. गावात एकच बाळू भटजी साठ एक वयाचे असतील, म्हणजे त्यावेळी मी सहावी-सातवीत होतो. गावात त्यांना बाळाप्पा म्हणायचे. बहुतेक चाकरमानी दुसऱ्या दिवसांनंतर गावात पोहोचत. गावात एकच ब्राह्मण असल्यामुळे पूजेची खूप धांदल उडत असे. बाळाप्पा स्वत:ची पूजा चार वाजता उरकत. नंतर त्यांचे चुलते बापट यांच्या घरी जात. मग गावचे खोत म्हणजे आमच्या मामाचे घर.
तोपर्यंत सकाळचे सात वाजलेले, आम्ही सारे मुले तयार असायचो. बाळाप्पा दुरून सायकलवरून दिसले की आम्ही सर्व मुले बाळाप्पा इलो…बाळाप्पा इलो… एकाच स्वरात गलका करायचो. मग घरात धांदल उडायची. बाळाप्पा देवासमोर बसायचे, सर्व तयारी पाहायचे. मग एखाद्या पोरास ओरडायचे, कायरे शींच्या तीनच फळे? असे म्हणताच आतून मामीचा आवाज येत असे, येतात… येतात… अजून दोन येतात… मग मामा स्वतः पूजेस बसत. बाळाप्पा पूजा सांगे, नंतर आरती प्रसाद होई.
आमच्या पूजेनंतर बाळाप्पा ज्यांच्या हातास लागेल त्यांच्या घरी पूजा होई कारण बाहेर एक दोन जण उभेच असत. मग बाळाप्पा पहिले जवळ कुणाचे घर आहे त्याच्याकडे जाऊन पुढे दुसऱ्याकडे येतो असे सांगायचे. दोन्ही घरे शेजारीच असतील तर बाळाप्पा एकाच्या घरी जाताना आपली सायकल दुसऱ्याकडे द्यायचे व सांगायचे यांची पूजा झाली का इलोय तूझ्याक. कुणी मुंबईहून मोठी व्यक्ती आली तर आमच्याकडे निरोप यायचा व पूजा झाली की मागच्या दाराने ते बाळाप्पांना त्यांच्याकडे घेऊन जात. मग बाहेरील मंडळींना बराच वेळ झाल्यावर संशय येत असे मग ते विचारत. मग घरातून सांगितले जायचे की बाळाप्पा मागून विश्याकडे गेले मग घरासमोरील दोघे तिघे धावत विश्याच्या घरापाशी जात.
कधी कधी तर बाजूच्या गावातील कुणीतरी मोटारसायकलवरून बाळाप्पास मागच्या मागे घेऊन जायचे. मग काय आमच्या गावातील ज्याच्याकडे मोटारसायकल असेल तो गाडी काढून जायचा. तिथे गावात गेल्यावर तेथील लोकांशी बाचाबाची करून एक पूजा झाल्यावर बाळाप्पास पुन्हा घेऊन यायचा. बरं ज्याने बाळाप्पास मोटारसायकलवर आणले त्याचा मित्र कुणी असेल तर मग त्याला बोलवून त्यांच्या पूजेनंतर मागच्या दाराने बाळाप्पास त्या मित्राकडे पाठवले जायचे. गावातील सगळ्या पूजा आटोपेपर्यंत बाळाप्पा घामाघूम होऊन जायचा. गावातील शेवटची पूजा होईपर्यंत सायंकाळ होत आलेली असे. शेवटचा यजमान बाळाप्पास म्हणे, “माका शेवट ठेवलास?’ त्यावर बाळाप्पा त्यास म्हणे, “पुढच्या वर्षी तुझा पयाला नंबर लावतो चल तयार हो’. एवढे ऐकून यजमानास जरा बरे वाटे. शेवटची पूजा होऊन गेल्यावर बाळाप्पाचा अवतार एखादी लढाई लढून आल्यासारखा वाटत असे.