कळमोडीतील जलसाठ्याचे पूजन
राजगुरूनगर – कळमोडी धरण पर्यटनाला चालना देणार आहे. याभागात आवश्यक त्या सर्व त्या सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रयत्न आहे. याभागातील स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कळमोडी धरण प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
यावर्षी जिल्ह्यात सर्वांत आधी (11 जुलै) कळमोडी धरण शंभर टक्के आहे. त्यातील जलसाठ्याचे पूजन (दि. 22) आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता डी. एम. डिग्गीकर, शाखा अभियंता उत्तम राऊत, रोहिदास नाईकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सरचिटणीस लक्ष्मणराव मुके, चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे, अरुण मुळूक, कळमोडीच्या सरपंच हेमलता गोपाळे, दत्ता सूर्यवंशी, सुजाता पचपिंड, नामदेव गोपाळे, काशिनाथ गोपाळे, दिगंबर गोपाळे, मुरलीधर नवले, यशवंत गोपाळे, संजय गोपाळे, कैलास कदम, नीलम मुळूक, शांताराम सातपुते, शांताराम बोंबले, सुजाता देवदरे, संभाजी बोंबले उपस्थित होते.
कळमोडी धरणाची 1 टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. आंबेगावातील सातगाव पठार आणि खेडच्या शेतकऱ्यांसाठी या धरणाची निर्मिती केली आहे; मात्र सातगाव पठारसाठी पाणी उपसा योजना कार्यान्वित नसल्याने या धरणातील पाणी चास कमान धरणात सोडण्यात येते. ते खेड आणि शिरूर तालुक्यासाठी सोडण्यात येते. धरणाखालील कळमोडी, चिखलगाव, साकुर्डी, माझगाव या गावांना त्याचा फायदा होत आहे.
पाणीसाठा कमी होत असल्याने या धरणाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे केली आहे. धरण परिसरात कळमोडी धरण प्रकल्पअंतर्गत असणारा दगडी राडाराडा बाहेर काढण्याची गरज आहे. चांगले रस्ते केले; मात्र काही ठिकाणी शेतकरी पाणी योजनांसाठी खोदत आहेत. त्यावर निर्बध आणले पाहिजेत.
-बाळासाहेब गोपाळे, माजी सरपंच