नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ४ आणि ५ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी विविध उद्योजकांची भेट घेतली. तसेच या उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले. पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी, असं आपल्या सरकारला वाटलं नाही? अशी सडकून टीका रोहित पवार यांनी केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या डावोस दौऱ्यावरूनही टोला लगावला, याला ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात’, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले… पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी, असं आपल्या सरकारला वाटलं नाही.
याला म्हणतात…
‘काखेत कळसा आणि गावाला वळसा!’— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 7, 2023
फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये उद्योजकांना सहभागी होण्याचे निमंत्रित देण्यासाठी योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांनी रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह टाटा सन्स, अदानी समूह, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आदी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांनी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली होती.