मुंबई – एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या सरकारला आता सहा महिने पूर्ण होत आहेत. अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी यात्रेसाठी गेले आहेत. यावेळी ते दोन दिवसांच्या साताऱ्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या गावी यात्रेसाठी आल्याने गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यावेळी गावकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले. तर, परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा देखील पार पडली. दरे तांब उचाट आदी पंधरा गावांची मिळून उत्तरेश्वर यात्रा भरते. एकनाथ शिंदे यांचे शुक्रवारी सायंकाळी गावात आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी रात्री परिसरात सुरु असणाऱ्या विकास कामांची माहिती घेतली. तर आज सकाळी गावात ग्रामसभा देखील पार पडली.
दरम्यान, दोन दिवसांच्या साताऱ्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे जवळच्या परिसरातील ग्रामस्थांच्या आणि शहरातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. शिंदेंनी आपल्या शेतात लावलेल्या स्ट्रॉबेरी पिकाची पाहणी केली. तसेच शेतात छोट्या चार्जिंग गाडीतून गावात चक्कर मारली.