नवी दिल्ली – न्या. राजेश बिंदल आणि न्या. अरविंदकुमार या दोन न्यायाधिशांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांनी त्यांना त्यांच्या पदाची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीमुळे सर्वोच्च न्यायालयातील सर्व 34 जागा आता भरल्या गेल्या आहेत.
बिंदल हे येथे येण्यापुर्वी अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश होते तर अरविंद कुमार हे गुजरात हायकोर्टात कार्यरत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची केंद्र सरकारकडे 31 जानेवारी रोजी शिफारस केली होती. 6 फेब्रुवारीला पाच न्यायाधिशांची सर्वोच न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. आता आणखी दोन न्यायाधिश नियुक्त केले गेल्याने तेथील न्यायाधिशांची संख्या 34 झाली आहे. केंद्र सरकारने कॉलेजिमयने केलेल्या शिफारशींना मंजुरच न दिल्याने या न्यायाधिशांच्या नियुक्त्या बरेच दिवस रखडल्या होत्या.
न्यायाधिशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून या नियुक्तीचे अधिकार सरकारकडेच देण्यात यावेत असा नवीन मुद्दा बरेच दिवस चर्चेत आणण्यात आला होता. तथापि सर्वोच्च न्यायालय कॉलेजियम पद्धतीवर ठाम राहिले. एवढेच नव्हे तर न्यायाधिश नियुक्त्यांच्या यादीला मंजुरी देण्यास आणखी विलंब लावल्यास सरकारला स्पष्ट शब्दात सुनावण्यातही आले होते. अखेर सरकारने नमते घेत या न्यायाधिशांच्या नियुक्त्यांना मंजूरी दिली. त्यामुळे मोठा संघर्ष टळला आहे.