पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : अपघातात पाय फ्रॅक्चर होऊन २५ टक्के अपंगत्व आलेल्या ज्येष्ठ व्यावसायिकाला घटनेनंतर तीन वर्षांनी न्याय मिळाला आहे. लोकअदालतमध्ये ७ लाख रुपये मान्य करण्यात आले. या निर्णयामुळे त्या व्यक्तीने समाधान व्यक्त केले आहे.
पीडित ६४ वर्षीय व्यक्ती हडपसर भागात राहतात. त्यांचा टुर्स ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या वतीने न्यायालयात अॅड. गणेश भूमकर यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. बंटी गायकवाड, अॅड. योगेश बाविकर, अॅड. अर्चना पाटील आणि अॅड. अमजद खान यांनी सहकार्य केले. 2५ फेब्रुवारी २०२१ रोजी पीडित हडपसर भागात फुटपाथवरून चालत होते. त्या वेळी फुटपाथवर चढून ट्रकने त्यांच्या पायाला धडक दिली.
त्यामध्ये त्यांच्या पायाला २५ टक्के अपंगत्व आले. उपचारासाठी खर्चही आला. त्यांनी जून २०२२ मध्ये अॅड. गणेश भूमकर यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधीकरण येथे नुकसान भरपाई मिळावी, यासाठी दावा दाखल केला.
ट्रकची विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला. ते व्यवसायातून दरमहा ३२ हजार ५०० रुपये कमवत होते. त्यांना आलेल्या अपंगत्वाचा विचार करून अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली.
विमा कंपनीच्या वतीने अॅड. प्रीतम लकडे यांनी काम पाहिले. लोकअदालमध्ये तडजोडीअंती ७ लाख रुपये देण्याचे मान्य करत दावा निकाली काढण्यात आला. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त करून ही रक्कम उतारवयात जगण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. न्याय मिळवून दिल्याबद्दल वकिलांचा आभारी आहे, असे ते म्हणाले.