पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ओला-उबर कंपन्यांना कोणतीही परवानगी नाही. तसेच कॅबसाठी दिलेले दराची अंमलबजावणी संबंधित कंपन्याकडून केली जात नाही. त्यामुळे या बेकायदा कंपन्यांवर कारवाई करावी. या कॅब बंद कराव्यात, यासाठी इंडियन गीग वर्कर्स फ्रंट (आयजीएफ) यांच्यावतीने शहरात दि. 5 मार्चपासून कॅब चालकांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ओला-उबरच्या कॅबचे दर निश्चित करण्यात आले होते. मात्र, संबंधित कंपन्यांकडून अंमलबजावणी होत नसल्याने आयजीएफकडून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्याबाबत निवेदन दिले.
मात्र, तरीही कंपन्यांकडून कार्यवाही झाली नाही. दरम्यान, याच विषयावर मागील आठवड्यात आरटीओ कार्यालयात दोन संघटनांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर वातावरण आणखी तापले. मात्र, कंपन्यांकडून नवीन कॅँब दराची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आयजीएफ संघटनेकडून बेमुदत संपाची हाक देत संपाला सुरुवात केली.
संपात रिक्षाचालकांचाही सहभाग
सकाळपासून सुरू केलेल्या संपाला दुपारनंतर चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपन्याच्या कॅब सोडल्या तर जवळपास 50 हजार आॅनलाइन कॅबचालक आणि रिक्षाचालक संपात सहभागी झाले. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कॅबचालकांचा समावेश आहे. दरम्यान, बेकायदा कंपन्यांवर कारवाई होत नाही.
मात्र, संघटनेला आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. तसेच हे आंदोलन शांततेत करायचे असून, जे सहभागी झाले नाही त्यांना कोणताही त्रास द्याचा नाही असे आवाहन केल्याचे संघटनेचे अध्यक्ष अॅड. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.