मुंबई : केंद्र सरकारने कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेत मांडली असून, त्यापैकी दोन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली आहे. एक विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून, राज्यसभेत पारित व्हायचं आहे. मात्र, या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरून भाजपाने चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेत वेगळी आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपाने टीका केली आहे. “महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम!”, असे म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे.
शिवसेनेने सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता..
आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठींबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग..
म्हणजे
महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवना पर्यंत "सेम टू शेम!"
गल्लीत नुसताच
गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2020
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. “शिवसेनेनं सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग. म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम!’ गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!”, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर त्यांच्या परस्परविरोधी भूमिकेवरून टीका केली आहे.
मोदी सरकारने कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली. लोकसभेत तिन्ही विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर दोन विधेयके रविवारी राज्यसभेत मांडण्यात आली. यावेळी लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग केला. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सोशल माध्यमांवरही ही चर्चा रंगलेली असतानाच भाजपानं निशाणा साधला.