शिरूर-हवेली मतदारसंघातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
न्हावरे – शिरूर तालुक्यात पाच वर्षांत कायमच वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलने झाली. त्यामध्ये चासकमानच्या डाव्या कालव्याचे पाणी असेल किंवा घोड नदी व घोड कालव्याच्या पाण्याचे फसलेले नियोजन असेल. यावरून तालुका कायमच प्रकाश झोतात राहिला. त्यामुळे तालुक्यात विकासकामांची कोटीच्या कोटी उड्डाणे फक्त घोषणाबाजीत दिसून आली, असे एक ना अनेक आरोप सामान्य जनता, शेतकरी व राजकीय वर्तुळातून होत आहेत.
शुरूर तालुक्याचे कारभारी विद्यमान आमदार आपले अपयश झाकण्यासाठी शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या घोडगंगा साखर करखान्यावरून आरोप करून आपली निष्क्रियता झाकण्याचे काम करीत आहेत. असाही आरोप वेगवेगळ्या स्तरातून होताना दिसत आहे. त्यामुळेच शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा बदलाचे वारे वाहत असल्याचे बोलले जात आहे.
शिरूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीकडून घोडगंगा कारखान्याच्या मुद्द्यावरून कायमच राजकारण केले जात आहे. कारखान्याला मदत करायचे सोडून फक्त राजकीय आकसाने संस्थेच्या अधोगतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फटका आमदार पाचर्णे यांना बसणार असून, त्यांच्या पोकळ विधानांना सभासद, शेतकरी विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आमदार पाचर्णे सर्वच मुद्द्यांवर अपयशी ठरले आहेत. – बाबासाहेब फराटे,
माजी उपाध्यक्ष, घोडगंगा कारखाना
नुकतीच रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यासभेत मी प्रश्न उपस्थित करत असताना आमदार पाचर्णे यांनी मला ‘ये माकडा खाली बस’ असे संबोधले.त्यामुळे घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा अपमान झाला आले.सत्तेचा वापर शिरुरचे आमदार जनकल्याणासाठी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी करतात.असे शेतकरी आंबूजी बोरकर यांनी सांगितले.तसेच आमदार पाचर्णे यांना बोरकर यांचे गाव असलेल्या कुरुळीमध्ये गाव बंदी करण्याचाही ठराव गावात सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यामुळे शिरूरचे राजकारण वेगळ्याच दिशेने जाताना दिसत आहे.- आंबूजी बोरकर,
शेतकरी व सभासद, घोडगंगा कारखाना
शिरूरच्या पूर्व भागात चासकमान डाव्या कालव्याच्या पाणी वितारणाबरोबरच घोड नदीच्या व कालव्याच्या पाण्याचे नियोजन गेल्या पाच वर्षांत फसले आहे. याला तालुक्याचे लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे घोड नदी काठच्या शेतीचे गेल्या पाच वर्षांत सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आमदार पाणी वाटपात निष्क्रिय ठरले आहेत. त्यांना शेतकरी माफ करणार नाही. त्याचप्रमाणे चासकमान डाव्या कालव्याच्या पाणी वितरणात आमदारांना “हेड टू टेल’ यातला फरक कळाला नाही. त्यामुळे चासकमान डाव्या कालव्यावर अवलंबून शेतीचे वाटोळे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी केले आहे.- दिलीप मोकाशी,
संचालक, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना