– पत्रकारांनी बरं नव्हे खरं लिहावे : प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे
– हजारो पत्रकारांच्या साक्षीने वेधले लक्ष
– पुण्यात पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा शानदार समारोप
पुणे : लोकशाहीची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी चौथ्या खांबाची भूमिका मोलाची असून सद्य परिस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवड- पुणे येथे केले. तर पत्रकारांनी बरं नव्हे तर खरं लिहिले पाहिजे असे सांगुन पत्रकार कोणत्याही पक्ष विचारांचा नसतो तो फक्त बातमीचा असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अध्यक्षीय समारोपात केले.
पुणे येथे शनिवार दिनांक १६ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित राज्यससतरीय अधिवेशनाच्या समारोप झाला.प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात झालेल्या अधिवेशन समारोपला खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री, आमदार बच्चूभाऊ कडू, आमदार महेश लांडगे, आदी मान्यवरांची उपस्थिती झाला. उद्घाटन सकाळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव ,प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे,उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ, यांच्या उपस्थितीत झाले .
समारोपाल कामगारांचे लढवय्ये नेते तथा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव , भोसरी मतदार संघाचे महेश लांडगे, शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे , आ. उमा खापरे,राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,चेतन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात AI चा शिरकाव पत्रकारांच्या बेरोजगारीत वाढ करणारा भासत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे चैनल, यूट्यूब चैनल, डिजिटल माध्यम उदयास येत आहेत विविध माध्यमे आपापल्या पद्धतीने उत्तम रित्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करत आहेत. हे करत असताना काही महत्वाच्या गोष्टीचे भान ठेवणे महत्वाचे आहे. पत्रकारांनी निष्पक्षपातीपणा, विश्वासार्हता टिकविणे अत्यावश्यक आहे.बातमी की जाहिरात या द्विधा संकटातूनही पत्रकाराला जावे लागते असे मत मांडले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे 25 हजाराहून अधिक सदस्य: प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, आलिकडे राजकीय लोक पत्रकारांनाही हा या विचाराचा तो त्या नेत्याचा अशी विभागणी करतात मात्र पत्रकार कोणाचाच नसतो तो केवळ बातमीचा असतो. बरं लिहिण्यापेक्षा खरं लिहिणे जास्त अपेक्षित आहे. वृत्तपत्रांचे अर्थकारण यावरही मंथन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यभरात पंचवीस हजाराहून अधिक अधिक पत्रकार सदस्य आहेत. त्यांच्या विविध प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यरत आहे. सर्वाधिक सदस्य संख्या असलेला हा राज्यातील एकमेव संघटना आहे, असे सूतोवाच केले.
सत्यशोधक पत्रकार लढवय्या असतो : बाबा आढाव
जेष्ठ बाबा आढाव म्हणाले, पत्रकारांच्या जीवनामध्ये नेहमीच संघर्ष व लेखणीतून लढाया असतात. राज्यातील सर्व पत्रकार एका ठिकाणी पाहण्याचा हा पहिलाच योग असावा पत्रकार हा समाजातील विविध प्रकारच्या समस्यांची नाडी जाणणारा डॉक्टरच असतो. त्यामुळे त्याने निर्भयपणे उत्तम लिखाण मांडावे. जेणेकरून सामाजिक हित जपण्यासाठी मदत होईल.
राज्य अधिवेशनाला देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांचा शुभेच्छा संदेश
चिंचवड येथे पार पडलेल्या राज्य अधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. पवार यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आज पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अनेक आव्हाने आहेत. लोकशाहीला मजबूत ठेवण्यासाठी निर्भीड पत्रकारिता आवश्यक आहे.
पत्रकारांमुळेच मी आमदार : बच्चू कडू
आमदार बच्चू कडू म्हणाले, एक सामान्य घरातील कार्यकर्ता ते आमदार होणं हे पत्रकारांमुळे शक्य झाले मात्र आज जाहिरात व पत्रकारिता याची रसमिसळ होत आहे. त्यामुळे चांगल्या पत्रकारांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी हातातील लेखणी मजबूत असावी असा सल्ला त्यांनी दिला.
पुढे बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, पत्रकारांमुळे समाजातील विविध घटकांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची भेट अधिवेशनाच्या निमित्ताने झाली. सर्वसामान्यांची बातमी म्हणजे वर्तमानपत्र ही वर्तमानपत्राची ओळख असायला हवी. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये असं म्हटलं जातं ते मतदानाच्या बाबतीतही होतं मात्र आता मतदान करताना भविष्याचा ही विचार करायला हवा. हा खरच अमृत काळ आहे का? याचे आत्मपरीक्षण करायला हवे.