सहकारी बॅंकांवर निर्बंध लादत असल्याचा आरोप
पुणे – पंजाब-महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील गैरव्यवहाराचे निमित्त करून देशातील सहकारी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. या धोरणाविरोधात महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन शनिवारी (दि.18) राज्यात हात जोडो आंदोलन करणार आहे.
काही सहकारी बॅंकांच्या संचालक मंडळातील चुकीच्या निर्णयामुळे अगदी मोजक्या सहकारी बॅंका अडचणीत आल्या आहेत. व्यावसायिक अपयशामुळे आतापर्यंत एकही सहकारी बॅंक अडचणीत आली नाही. डबघाईस आलेल्या बॅंकांवर कारवाईऐवजी रिझर्व्ह बॅंक नागरी सहकारी बॅंकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून व्यापारी बॅंकेत रुपांतरित होण्यास भाग पाडत आहे, असा आरोप फेडरेशनने केला आहे. पीएमसी बॅंकेतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने नागरी सहकारी बॅंकांबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. सहकारातील कीड नष्ट करण्याऐवजी सहकारालाच संपवण्याच्या हेतूने नागरी सहकारी बॅंकांवर कडक र्निबध लादण्यास सुरुवात केली आहे.
या बॅंकांच्या कर्जवाटपावर निर्बंध आणण्यात आले असून प्रत्येक बॅंकेला व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिल्याने नागरी बॅंकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता यावर शासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
नागरी बॅंकांचे थकीत कर्जाचे प्रमाण वाढवण्याची धमकी देऊन या बॅंकांवर व्यापारी बॅंकेत रूपांतरित होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या दबावामुळेच न्यू इंडिया को- ऑप. बॅंक व्यवस्थापनाने या बॅंकेचे व्यापारी बॅंकेत रूपांतर करण्याचे मनसुबे रचले आहेत. त्याला आमचा विरोध आहे. सभासदांनीही आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन
– विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक फेडरेशन