कोरेगाव – छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत असून, त्यांचे वंशज उदयनराजे भोसले आम्हास वंदनीय आहेत. त्यांचा अवमान आम्ही कदापी खपवून घेणार नाही. त्यांचा अवमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे. शासनकर्त्यांनी छत्रपती घराण्याविषयी बेताल वक्तव्ये करणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व खासदार संजय राऊत यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त शिवभक्तांनी शुक्रवारी कोरेगावात केली.
जितेंद्र आव्हाड व खा. संजय राऊत सातत्याने छत्रपती घराण्याविषयी बेताल वक्तव्ये करत असून, त्यांच्या वागण्यामुळे असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. बेताल वक्तव्ये करणाऱ्यांच्या निषेधार्थ कोरेगावात आंदोलन छेडण्यात आले. आझाद चौकात सकाळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव गवळी- भोसले, बबनराव कांबळे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे, नीलेश यादव, शहराध्यक्ष श्रीकांत बर्गे यांच्यासह भाजपच्या विविध विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले.
महिला पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. घोषणाबाजी करत आझाद चौकातून सुरु झालेला मोर्चा हुतात्मा स्मारक येथे पोहोचला. तेथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड व खा. संजय राऊत यांच्या प्रमितेस जोडे मारण्यात आले. त्यानंतर अचानक “रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. तेथून मोर्चा पुन्हा साखळी पूल, स्टॅंडमार्गे तहसील कार्यालयावर गेला.
तहसीलदार सौ. शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले. जितेंद्र आव्हाड व संजय राऊत यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त
ठेवला होता.