मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली तरी ते एका योद्ध्या सारखे लढत आहेत. असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक आणि अभिमान असल्याचे म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. ती कशा प्रकारची होती हे मी इथे सांगू इच्छित नाही. पण, अशा व्यक्तीने ताण-तणावापासून लांब रहावे असे सांगितले जाते. आपण सगळ्यांनी त्यांचे कौतुक करायला पाहिजे. आज युद्धाची परिस्थिती असतांना हे युद्ध मागून न-लढता एका धीरदस्त सेनापती प्रमाणे ते समोरून लढत आहेत आणि महाराष्ट्राला धीर देत आहेत. धन्य आहे… आणि अभिमान पण आहे.
राजेश टोपे यांच्यासारखी व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या मदतीला आहेत. त्यांची आई आजारी असताना ते लोकांसाठी काम करत आहे. त्यांच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा. काही दिवस घरी थांबा, आई वडिलांशी बोला, पुस्तकं वाचा, असे आवाहन सुद्धा आव्हाड यांनी केले.