मुंबई – भारताचा माजी कसोटीपटू व प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा वसिम जाफर याने क्रिकेटच्या तीनही प्रकारात जो यशस्वी होतो, त्यालाच मान मिळतो, असे सांगत मनातील खदखद व्यक्त केली आहे.
जाफरने काही दिवसांपूर्वीच रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याद्वारे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या क्रिकेटच्या तीनही प्रकारात जो खेळाडू सातत्याने यशस्वी कामगिरी करतो त्यालाच योग्य मान मिळतो, असे सांगितले आहे.
सध्या चेतेश्वर पुजारावर संथ खेळल्याबद्दल टीका होत आहे, त्याचाच धागा पकडून जाफरने आपली मते मांडली आहेत. पुजाराला आदर मिळत नाही असे नाही पण पूर्वी व्हिव्हिएस लक्ष्मण व राहुल द्रविड यांच्या बाबतीत जे घडले तेच पुजाराच्या बाबतीत सध्या घडत आहे. द्रविड व लक्ष्मण यांचाही दर्जा मोठा होता, मात्र त्यावेळी त्यांना जो मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही. त्यांच्यावर कसोटी क्रिकेटपटू असा शिक्का बसला.
या दोन्ही खेळाडूंनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली मात्र त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. या दोन्ही खेळाडूंबरोबर खेळण्याचे भाग्य मला लाभले, त्यामुळे ते किती महान क्रिकेटपटू आहेत हे मला माहीत आहे. त्यांनी पराभव दिसत असतानाही अनेक सामने चमत्कार केल्याप्रमाणे खेळ करत संघाला जिंकून दिले आहेत.
लक्ष्मण व द्रविडची कोलकता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी कोणीच विसरू शकत नाही. मात्र, सातत्याने सरस कामगिरी करूनही त्यांच्या वाट्याला काय आले, हे क्रिकेट रसिकांना चांगलेच माहीत आहे, असेही जाफरने स्पष्ट केले.